अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
जमीन व्यवहारातील 25 हजार रुपये न दिल्याने एका तरुणाला मारहाण करत त्याचे अपहरण करण्यात आले आहे. रौनक सुभाष चुडीवाल (वय 33 रा. धरतीचौक) असे अपहरण झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगलसिंग संतोषसिंग धारीवाल (रा. वडारवाडी, भिंगार), सनी शंकर निकाळजे (रा. गौतमनगर, भिंंगार नाका, भिंगार) व अभि शंकर वाघेला (रा. नेहरू कॉलनी, भिंगार) अशी त्यांची नावे आहेत. सुभाष चुनिलाल चुडीवाल (वय 70) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे प्लॉट खरेदी व विक्रीचा व्यवसाय करतात. या व्यवहारामध्ये मुलगा रौनक त्यांना मदत करत असतो. रौनक याने मंगलसिंग संतोषसिंग धारीवाल यांचे आईचे भाऊ देवराम भागाजी गायकवाड (रा. पिंपळगाव वाघा ता. नगर) यांची नऊ एकर जमीन विकत घेतली होती.
त्या जमिनीचे पैसे भाव हिश्याप्रमाणे दिले होते. रविवारी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास फिर्यादी, त्यांची पत्नी, मुलगा रौनक घरी असताना धारीवाल, निकाळजे, वाघेला हे तेथे आले. त्यातील मंगलसिंग धारीवाल फिर्यादीला म्हणाली,‘तुमचा मुलगा रौनक याने पिंपळगाव वाघा येथील नऊ एकर जमीन विकत घेतली असून त्याचे भाव हिश्याप्रमाणे आमचे 25 हजार रुपये देणे बाकी आहे, ते आम्हाला आजपर्यंत दिले नाहीत.
तुम्ही जोपर्यंत जमिनीचे व्यवहाराचे पैसे देत नाही, तो पर्यंत आम्ही तुमचा मुलगा रौनक यास बरोबर घेऊन जात आहोत’, असे म्हणून रौनक यास बरोबर घेऊन जात असताना फिर्यादी यांनी त्याला विरोध केला असता त्यांनी शिवीगाळ दमदाटी करून रौनक यास लाथाबुक्क्यांनी मारहाण करून दुचाकीवरून घेऊन गेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.