Friday, April 26, 2024
Homeनगरसर्वांच्या सहकार्यामुळेच ‘मुळा’चा गाळप हंगाम यशस्वी - यशवंतराव गडाख

सर्वांच्या सहकार्यामुळेच ‘मुळा’चा गाळप हंगाम यशस्वी – यशवंतराव गडाख

सोनई |वार्ताहर| Sonai

मुळा कारखान्याच्या कार्यक्षेत्रातही अतिरिक्त ऊस होता. संपूर्ण उसाचं गाळप होईल की नाही याबाबत सभासद व ऊस उत्पादकांना शंका होत्या पण अशी परिस्थिती निर्माण होईल याचा अंदाज लक्षात घेऊनच संचालक मंडळ व अधिकार्‍यांनी ऊस गळिताचे चांगले नियोजन केले. त्यामुळे मुळा कारखान्याच्या इतिहासातील सर्वाधिक 15 लाख 30 हजार टन गाळप करून विक्रम प्रस्थापित झाला, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी केले.

- Advertisement -

मुळा कारखान्याच्या गळीत हंगामाची सांगता बुधवारी ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख पाटील यांच्याहस्ते उसाची शेवटची मोळी गव्हाणीत टाकून करण्यात आली. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. योग्य नियोजन करून गळीत हंगाम पूर्ण केल्याबद्दल कारखान्याचे संचालक मंडळ, कार्यकारी संचालक शरद बेल्हेकर व त्यांचे सहकारी चिफ इंजिनियर, चिफ केमिस्ट व मुख्य शेतकी अधिकारी, सभासद व ऊस उत्पादक तसेच तोडणी वाहतूक यंत्रणा या सर्वांचे त्यांनी अभिनंदन केले.

यशवंतराव गडाख आपल्या प्रमुख भाषणात म्हणाले, या गळीत हंगामात अतिरिक्त उसाचा अंदाज आल्याने संपूर्ण उसाचे गाळप करण्यासाठी अगोदरच नियोजन करण्यात आले होते. अनेक आव्हाने आणि अडचणी असताना त्या सगळ्यांवर मात करून या गळीत हंगामात 450 कोटी रुपयांची साखर, 20 कोटी रुपयाची वीज आणि 50 कोटी रुपयाचं इथेनॉल तयार केलं. इथेनॉलसाठी घेतलेले कर्जही 2-3 वर्षांमध्ये फिटणार आहे. या हंगामात जिल्ह्यातले इतर कारखाने ऊस न्यायला तयार नव्हते. कारण प्रत्येकाच्या कार्यक्षेत्रामध्ये पुरेसा ऊस होता. पण आपण ऊस तोडणी मजुरांना प्रोत्साहनपर 50 रुपये प्रती टनाप्रमाणे अनुदान दिले. त्यामुळे उसाची आवक वाढली. ऊस संपवता आला. पण शेवटी ऊस दिलेल्या शेतकर्‍यांनाही काही झळ बसली. अशा शेतकर्‍यांना मदत म्हणून 16 एप्रिल ते 30 एप्रिल पर्यंत गळीत झालेल्या उसाला 75 रुपये व त्यानंतर गळीत झालेल्या उसाला 150 रुपये प्रती टनाप्रमाणे अनुदान दिले.

पुढच्या वर्षी सुद्धा 12 ते 13 लाख टन ऊस आहे. पुढचा हंगाम सुद्धा मोठा असणार आहे. तेव्हा अधिकार्‍यांनी आतापासूनच तयार राहिलं पाहिजे. बंद हंगामातली मशिनरीची जी कामे आहेत ती वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. उसाचे गाळप वेळेत पूर्ण होण्याच्यादृष्टीने पुढच्या काळात हार्वेस्टर मशिनवर सुद्धा अधिक भर द्यावा लागेल. त्यासाठी सभासदांनी पुढाकार घ्यावा, असेही आवाहन गडाख यांनी केले.

संचालक निलेश पाटील व त्यांच्या सौभाग्यवती अनिता निलेश पाटील तसेच संचालक रंगनाथ जंगले व त्यांच्या सौभाग्यवती अलका रंगनाथ जंगले यांच्याहस्ते पूजाविधी करण्यात आला.

चेअरमन नानासाहेब तुवर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. अ‍ॅड. काकासाहेब गायके व कारभारी जावळे यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी कारखान्याचे अधिकारी शरद बेल्हेकर, चिफ इंजिनिअर ठोंबरे, मुख्य शेतकी अधिकारी विजय फाटके, चिफ केमिस्ट श्रीधर गाढे व पांढरपट्टे, ए. डी. वाबळे, बाळासाहेब दरंदले यांचा प्रतिनिधिक स्वरुपात सत्कार करण्यात आला. त्यानंतर कारखान्यास हंगामात सर्वाधिक ऊस पुरवठा केलेल्या टायरगाडी, गाडीसेंटर, डम्पिंग व ऊस तोडणी मशीन (हार्वेस्टर) कंत्राटदारांचा शाल, श्रीफळ व रोख बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमास कारखान्याचे उपाध्यक्ष कडुबाळ कर्डिले, विश्वासराव गडाख, जबाजी फाटके, रामभाऊ जगताप, नेवाशाचे उपनगराध्यक्ष लक्ष्मण जगताप, अनिल अडसुरे, रामकिसन शिंदे, वहाब शेख, कैलास जाधव, रमेश कराळे, नानासाहेब रेपाळे, कारभारी जावळे, पांडुरंग निपुंगे, पी. आर. जाधव, उपसभापती किशोर जोजार, आप्पासाहेब निमसे, शरद जाधव, कर्णासाहेब औटी, सतीश निपुंगे, जालिंदर येळवंडे, रावसाहेब लांडे, आदिनाथ रौंदळ तसेच सर्व संचालक, कार्यकर्ते, सभासद व ऊस उत्पादक शेतकरी, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन सेक्रेटरी रितेश टेमक यांनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या