नाशिक । Nashik (प्रतिनिधी)
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सोमवारी (दि. ४) उमेदवारी अर्ज माघारी मुदत असून त्याकडे अवघ्या जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. अर्ज छाननीत ४०४ उमेदवारांचे अर्ज बाद ठरल्यानंतर १६ हजार ६०२ उमेदवार निवडणुक लढविण्यासाठी पात्र ठरले आहेत. त्यामुळे उदयाच्या अर्ज माघारीनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान, माघारीसाठी रविवारी ‘अर्थ’पूर्ण घडामोडी घडल्याची जोरदार चर्चा रंगली होती.
ऐन कडाक्याच्या थंडित ग्राम पंचायत निवडणुकीमुळे जिल्ह्याचे वातावरण तापले असून धुराडा उडाला आहे. जिल्ह्यात १३ तालुक्यातील ६२१ ग्रामपंचायतींसाठी तब्बल १७ हजार सहा उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते.
गुरुवारी (दि. ३१) झालेल्या अर्ज छाननी प्रक्रियेत ४०४ उमेदवारांचे अर्ज कागद पत्रांची अपूर्तता व तांत्रिक अडचणीमुळे बाद ठरले. त्यामुळे १६ हजार ६०२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे.
आज अर्ज माघारि असल्याने किती उमेदवार माघार घेतात, कोणती ग्रामपंचायत बिनविरोध होते याबाबत उत्सुकता शिगेला पोहचलि आहे. बंडोबांना थंड करण्यासाठी व अर्ज माघारी घेण्यासाठि रविवारी जोरदार हालचाली सुरु होत्या.
काही ठिकाणी घोडेबाजार देखील झाल्याचे समजते. आज दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज माघारीची मुदत असून त्यांनतर निवडणूक लढविणार्या उमेदवारांना चिन्ह वाटप केले जाईल. येत्या १५ जानेवारीला मतदान तर १८ जानेवारीला मतमोजणी केली जाणार आहे.