पुणे l Pune
पुण्यातील कोथरुड येथे घुसलेल्या रानगव्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रानगव्याला पकडण्यासाठी वन विभागाकडून रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलं होतं. सहा तासाहून अधिक
काळ सुरू असलेल्या थरारनाट्यानंतर अखेर महात्मा सोसायटी परिसरात घुसलेल्या गव्याला पकडण्यात यश आले. मात्र, काही वेळात त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
कोथरूडमध्ये रानटी गवा शिरल्याची बातमी समजताच महात्मा सोसायटीच्या परिसरात अनेक बघ्यांनी गर्दी केली होती. यामध्ये हा रानटी गवा काहीसा भेदरला. त्यातच रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान वनविभागाची त्याला धरण्याची धडपड आणि बघ्यांची झालेली गर्दी यामुळे रानगवा घाबरून सैरावैरा धावू लागला. यामध्ये रानगवा जखमी झाला होता आणि त्याच्या तोंडातून रक्त वाहत होतं. त्यानंतर दोन- तीनवेळा त्याला इंजेक्शन देण्यात आले.
यामुळे धावाधाव झाल्यामुळे घाबरून (धाप लागून) मृत्यू झाला असण्याची शक्यता आहे. अशी माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे. पण शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे देखील वनविभागाकडून सांगण्यात आले आहे.