कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav
पश्चिमचे पाणी पूर्वेकडे वळवण्याचा अहवाल तयार करण्याचे काम सुरु असून त्या अहवालात कोपरगाव तालुक्याचा समावेश होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्व राजकीय, सामाजिक व लाभार्थी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे, असे आवाहन माजी नगराध्यक्ष पद्माकांत कुदळे यांनी केले आहे.
माजी नगराध्यक्ष पद्माकांत कुदळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिष्टमंडळाने नाशिक पाटबंधारे विभाग येथे शेतकर्यांच्या पाटपाणी संबंधित विविध मागण्यांसाठी चर्चा करण्यासाठी व निवेदन देण्यासाठी नाशिक येथे पाटबंधारे विभागाचे उत्तर विभागाचे मुख्य अधिकारी डॉ. संजय बेलसरे तसेच कार्यकारी अभियंता सागर शिंदे व कोपरगाव येथील उपविभागीय अभियंता तात्यासाहेब थोरात यांची भेट घेतली. त्यांना गोदावरी कालव्यावरील विविध मागण्यासाठी निवेदन दिले. त्यात गोदावरी कालव्याला खरीपाला पाणी द्यावे, चारा पिक व कांदा पिकास नमुना न. 7 वर पाणी द्यावे तसेच पाणीपट्टीत झालेली भरमसाठ वाढ रद्द करावी या प्रमुख मागण्या होत्या.
त्यावेळी चर्चा करत असतांना असे निदर्शनास आले, पश्चिमचे पाणी पूर्वेकडे वळवण्याचा अहवाल तयार करण्याचे काम सुरु असून त्या अहवालात कोपरगाव तालुक्याचा समावेश होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्व राजकीय, सामाजिक व लाभार्थी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे अन्यथा भविष्यात गोदावरी कालव्यांना पाणी मिळणे अशक्य होणार आहे असे माजी नगराध्यक्ष पद्माकांत कुदळे म्हणाले.
या शिष्टमंडळात शिवसेना तिरोडा विधानसभा संपर्कप्रमुख प्रविण शिंदे, काँग्रेस तालुकाध्यक्ष नितीन शिंदे, मनसे उपजिल्हाप्रमुख संतोष गंगवाल, प्रगतशील शेतकरी बाबा रासकर, पाणी अभ्यासक शेतकरी तुषार विद्वांस उपस्थित होते.