कोलकाता | Kolkata
पश्चिम बंगालमध्ये सध्या विधानसभेची रणधुमाळी सुरु आहे. याच दरम्यान मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी निवडणूक आयोगाविरोधात धरणे आंदोलनाला बसल्या आहे.
निवडणूक प्रचारादरम्यान केंद्रीय निमलष्करी दलांबाबत आक्षेपार्ह शेरेबाजी आणि धार्मिक अभिनिवेश असलेली वक्तव्ये केल्याबद्दल ममता बॅनर्जी यांच्यावर निवडणूक आयोगाने २४ तासांसाठी प्रचारबंदी लागू केली. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी आपल्या कारकिर्दीच्या शेवटच्या दिवशी ही कारवाई केली. निवडणूक आयोगाचा निर्णय एकतर्फी असल्याची टीका करत त्याविरुद्ध त्या धरणे आंदोलन करत आहे.
ममता बॅनर्जी यांनी ट्विट केले होते की, निवडणूक आयोगाच्या असंवैधानिक निर्णयाच्या विरोधात मी मंगळवारी दुपारी १२ वाजेपासून गांधी मूर्ती, कोलकाता येथे धरणे आंदोलनावर बसणार आहे. धरणे आंदोलनंतर ममता बॅनर्जी रात्री आठ नंतर दोन सभा देखील करणार आहेत.
दरम्यान, निवडणूक आयोगाच्या कारवाईवर तृणमूल काँग्रेस आणि ममता बॅनर्जींनी जोरदार निशाणा साधला. हा लोकशाहीतील काळा दिवस आहे, अशी प्रतिक्रिया तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी दिली.
तसेच, या बंदीवरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर टीका केली आहे. ममता बॅनर्जी यांच्यावरील बंदी म्हणजे लोकशाहीच्या सार्वभौमत्वावर केलेला हल्ला आहे. या हल्ल्याविरोधात आम्ही ममता बॅनर्जी यांना पाठिंबा देत आहोत, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
काय म्हंटल आहे निवडणूक आयोगाने?
कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होईल, अशा प्रकारची वक्तव्ये ममता बॅनर्जी यांनी केली असून, या वक्तव्यांचा आयोग निषेध करीत आहे. आचारसंहिता लागू असताना अशा प्रकारची वक्तव्ये करणे टाळावे, असे निवडणूक आयोगाने आपल्या आदेशात म्हटले आहे. निवडणूक आयोगाची बंदी सोमवार १२ एप्रिल रात्री ८ वाजल्यापासून लागू झाली असून, ती मंगळवार १३ एप्रिल रात्री ८ वाजेपर्यंत अमलात राहील.
Leave a Reply