अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
शहरात व उपनगर भागात मागील काही दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. अनेक भागात पाण्याच्या समस्या आहेत. नागरिकांच्या तक्रारी वाढत आहेत. याप्रकरणी भाजप नगरसेवकांनी माजी महापौर बाबासाहेब वाकळे व शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांच्या नेतृत्वाखाली मनपा आयुक्त शंकर गोरे यांची भेट घेऊन आंदोलनाचा इशारा दिला आहे.
यावेळी वाकळे, गंधे, उपमहापौर मालन ढोणे, रवींद्र बारस्कर, अजय चितळे, उदय कराळे, प्रदीप परदेशी, संजय ढोणे, बंटी ढापसे आदी उपस्थित होते.
नगर शहरातील पाणीपुरवठा गेल्या अनेक महिन्यापासून विस्कळीत झाला आहे. तसेच काही भागांमध्ये कमी दाबाने व रात्री-अपरात्री सुटणारे पाणी वेळेवर सोडले जात नाही. त्यामुळे शहरातील नागरिक पाणीटंचाईमुळे त्रस्त झाली आहेत. नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. महापालिका प्रशासनाकडे पत्रव्यवहार व पाठपुरावा करूनही कुठल्याही उपाय योजना झालेल्या नाहीत. येत्या आठ दिवसांमध्ये शहरातील पाणीपुरवठा नियमित व सुरळीत करावा अन्यथा महापालिकेत भाजपाच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
आयुक्त गोरे यांनी नगरसेवकांशी चर्चा करून सोमवारपासून मुळा धरण येथे नवीन पंप कार्यान्वित करण्यात येईल, शहरात व उपनगर भागात वॉलमनची मानधनावर लगेच नियुक्ती केली जाईल, असे आश्वासन दिले आहे.