Thursday, April 25, 2024
Homeनगरजलसंपदाने काम पूर्ण झालेल्या डाव्या कालव्याची चाचणी घ्यावी

जलसंपदाने काम पूर्ण झालेल्या डाव्या कालव्याची चाचणी घ्यावी

पिंपरी निर्मळ |वार्ताहर| Pimpari Nirmal

उत्तर नगर जिल्ह्यातील जिरायती व कायमच दुष्काळी टापूतील 182 गावांतील शेतकर्‍यांना शेती सिंचनासाठी पाणी मिळावे यासाठी निळवंडे धरण बांधून झाले आहे. गेल्या आठ महिन्यांपासून धरणाच्या मुख्य कालव्यांची चाचणी होणार असल्याची तारीख पे तारीख जाहीर होत आहे. प्रत्यक्षात निळवंडेच्या मुख्य डाव्या कालव्याचे काम मार्च अखेर पूर्ण झालेले आहे. धरण भरलेले असून धरणात पाणी असताना कालव्यांची चाचणी रखडली आहे. उन्हाळ्यात चाचणी झाल्यास पावसाळ्यात ओव्हर फ्लोच्या पाण्याचा या जिरायत भागाला फायदा होणार आहे. जलसंपदा विभागाने तातडीने काम पूर्ण झालेल्या मुख्य डाव्या कालव्याची चाचणी घ्यावी, अशी मागणी शेतकर्‍यांमधून होत आहे.

- Advertisement -

महाविकास आघाडी सरकारने 2019-22 या काळात प्रकल्पासाठी जवळपास 1100 कोटीचा निधी दिला. तात्कालीन जलसंपदामंत्री जयंत पाटील यानी निळवंडे प्रकल्पासंदर्भात कालव्यांची उर्वरीत कामे वेळेत पूर्ण करून ऑक्टोबर 2022 मध्ये मुख्य कालव्याची चाचणी घेणार असल्याची ग्वाही विधानसभेत दिली होती. दरम्यानच्या काळात हे सरकार पडले. नव्याने सत्तेत आलेल्या शिंदे फडणीस सरकारने अर्थसंकल्पात भरीव तरतूद करीत पावणे तीनशे कोटींचा निधी मंजूर केला. खा. सदाशिव लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत डिसेंबर 2022 मध्ये मुख्य कालव्यांची चाचणी घेण्याचे निर्देश दिले. मात्र काम पूर्ण न झाल्याने ही चाचणी होऊ शकली नाही.

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीमध्ये मार्चमध्ये मुख्य कालव्यांची चाचणी घेण्याची घोषणा केली. मार्चमध्ये चाचणी होणार या उद्दिष्टामुळे पाटबंधारे विभागाने या कालावधीत डाव्या कालव्याचे काम पूर्ण केले आहे. मात्र मार्चमध्येही ही चाचणी होऊ शकली नाही.काम पूर्ण होऊन जवळपास दीड महिना झाला आहे. निळवंडे धरणात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा शिल्लक आहे.

या उन्हाळ्यात काम पूर्ण झालेल्या डाव्या मुख्य कालव्याची चाचणी झाल्यास पुढील महिन्यापासून सुरू होणार्‍या पावसाळ्यात या कालव्यांतून ओव्हरफ्लोचे पाणी सोडणे शक्य होणार आहे. असे झाल्यास लाभक्षेत्रातील बर्‍याच गावांतील ओढे नाले पाझर तलाव यामध्येही हे पाणी देता येणार आहे. यामुळे वर्षानुवर्षे दुष्काळाशी सामना करणार्‍या जिरायती भागातील शेतकर्‍यांना खरीप रब्बी हंगामात मोठा फायदा होणार आहे.

पाटबंधारे विभागाने निळवंडेच्या डाव्या मुख्य कालव्याचे काम पूर्णत्वास नेले आहे. या कालव्यावर अकोले, संगमनेर, राहाता, श्रीरामपूर, कोपरगाव या तालुक्यातील जवळपास 44 हजार हेक्टर क्षेत्र येते. मुख्य कालवा व त्याचे तळेगाव फाटा, कोपरगाव फाटा व जांभुळवाडी फाटा प्रवाहीत झाल्यास या कालव्याच्या कडेला असलेल्या बहुतांश गावांना याचा थेट लाभ होणार आहे.

निळवंडे डाव्या कालव्याचे काम मार्च अखेर पूर्ण झालेले असून या कालव्याची चाचणी घेणे शक्य आहे. तसेच तळेगाव फाटा व कोपरगाव ब्रँचसाठी आवश्यक असलेल्या हायड्रो रेग्युलेटरचे डिझाईन पूर्ण झाले असून मंजुरी मिळताच तेही काम पूर्ण कले जाईल. मात्र त्यामुळे मुख्य कालव्याच्या चाचणीत कोणताही अडथळा येणार नाही.

– कैलास ठाकरे, विभाग प्रमुख पाटबंधारे डावा कालवा

डाव्या मुख्य कालव्याचे काम पूर्ण झाले आहे. जलसंपदा विभागाने तातडीने पावसाळ्यापूर्वी या कालव्याची चाचणी घ्यावी. जेणेकरून कालव्याच्या लगतच्या शेतकर्‍यांना शेतीसाठी तसेच पिण्याच्या पाण्यासाठी याचा लाभ होईल. तसेच उजव्या मुख्य कालव्याचेही काम पूर्ण करण्यासाठी डिव्हीजन व यंत्र सामुग्री वाढवावी.

– नानासाहेब शेळके, अध्यक्ष निळवंडे पाटपाटणी कृती समिती

- Advertisment -

ताज्या बातम्या