अहमदनगर (प्रतिनिधी) – पाणी टंचाईवर मात करण्यासाठी ग्रामीण भागात शुद्ध व पिण्याचे पाणी मिळावे या अनुषंगाने महाराष्ट्र व्हीलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाउंडेशन, युनिसेफ इंडिया आणि भारत सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या जलशक्ती अभियानाला जिल्ह्यात मोठे यश मिळाले आहे. जिल्ह्यातील कर्जत-जामखेडमधील 8 गावांत 1 कोटी 92 लाख लिटर पाण्याची साठवण करणे शक्य झाले आहे.
जलशक्ती अभियान ही मोहीम आखून राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये 20 गटांची निवड केली होती. यात लातूर जिल्ह्याचा समावेश आहे. या मोहिमेचा पहिला टप्पा 8 जुलै 2019 ते 15 सप्टेंबर 2019 असा होता. दुसरा टप्पा 1 ऑक्टोबर रोजी सुरू झाला आणि 30 नोव्हेंबर 2019 रोजी तो संपला. या कालावधीत कर्जत-जामखेडमधील आठ गावांमधून युनिसेफच्या तांत्रिक साह्याने जलशक्ती अभियान राबविण्यात आले. अभियान कालावधीत जमिनीत पाणी जिरविण्यासाठी खड्डे खोदणे, विहिरीमधील गाळ काढणे अशी जलसंधारणाची कामे करण्यात आली. वनीकरणाची कामे, व्हीएसटीएफ प्रकल्पातील 8 गावात प्रभावीपणे राबविण्यात आली.
जिल्ह्यात विविध विभागांचा एकत्रित सहभाग आणि इतर संस्थांचा पाठिंबा यामुळे या गावात शोष खड्डे, पुनर्भरणासाठी विहिरी आणि नलिका, पावसाची पाणी जिरवणे आणि नाल्यांमधील गाळ काढणे अशी कामे शक्य झाली. या कामांवर 11 लाख 48 हजार रुपये खर्च आला. मनरेगा निधी आणि बाह्य संस्थात्मक निधी यातून हा खर्च करण्यात आला. या कामांचा लाभ 379 कुटुंबाना मिळाला. तसेच व्यापक वनीकरणाचा भाग म्हणून या 8 गावांमध्ये 11 हजार 300 झाडे लावण्यात आली.
मुख्यमंत्री ग्रामविकास प्रतिनिधीचे जलशक्ती अभियानासाठी आवश्यक असणारे प्रशिक्षण किनवट येथे आयोजित करण्यात आले होते. जिल्हा प्रशासन आणि विविध विभाग प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली व्हीएसटीफच्या टिमने 8 गावांतून 23 बांधकामातून 1 कोटी 92 लाख लिटर पाण्याची साठवणूक केल्याने आगामी काळात या कामामुळे या भागात पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध होईल. या अभियानात युनिसेफच्या तांत्रिक साह्यासह पाणी फाउंडेशन, भारतीय जैन संघटना आणि बारामती अॅग्रो या संस्थांचा पाठिंबा होता.
असा होणार लाभ
योजनेतील गावांमध्ये पाणी साठवण्यासाठी 23 बांधकामे झाली आणि पाणी पुनर्भरणासाठी कूप तयार झाले. एकूण साठवण क्षमता 1 कोटी 92 लाख लिटर एवढी झाली. या बांधकामांसाठी 11 लाख 48 हजार रुपये खर्च आला. या बांधकामाचा लाभ 379 कुटुंबाना होईल आणि 1776 व्यक्तींना विविध कामांसाठी पाणी उपलब्ध होईल. याठिकाणी कामे सुरू असताना जिल्हा आणि गाव पातळीवरील कार्यकर्त्यांनी आणि अधिकार्यांनी व्हॉट्सअॅप ग्रुप करून आणि इतर समाजमाध्यमांचा वापर करून एकमेकांशी संपर्क ठेवला आणि कामाच्या प्रगतीची माहिती एकमेकांना दिली. जिल्हा पातळीवर नियोजन आणि समन्वय ठेवल्यामुळे त्यांना निधीसाठी पाठपुरावा करणे आणि उपलब्ध सामग्रीचा कुशल वापर करणे शक्य झाले.