कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav
गोदावरी कालव्यातून कोपरगाव शहराला देण्यात येणारी पाण्याची पट्टी व्यावसायिक दराने न आकारता घरगुती दराने आकारण्यात यावी यासाठी पाटबंधारे अधिकार्यांसमवेत घेण्यात आलेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.
शहराला पाणीपुरवठा करणार्या चारही साठवण तलावांना पाटबंधारे विभाग गोदावरीच्या डाव्या कालव्यातून पाणी देण्यात येते. या पाण्याची पाणीपट्टी वर्षानुवर्षापासून व्यावसायिक दराने आकारली जात आहे. त्यामुळे पालिकेवर मोठा आर्थिक बोजा पडत आहे. लवकरच या चार साठवण तलावांच्या जोडीला पाच नंबर साठवण तलावाची भर पडणार आहे. त्यामुळे कोपरगाव नगरपालिकेवर अधिक बोजा पडू नये यासाठी आकारण्यात येणारी पाणीपट्टी घरगुती दराने आकारली जावी यासाठी नासिक येथे पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात पाटबंधारे अधिकारी व कोपरगाव नगरपरिषदेच्या अधिकार्यांसमवेत बैठक घेतली.
या बैठकीत पाणीपट्टी घरगुती दराने आकारण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले आहे. बैठकीसाठी गोदावरी कालवे अधीक्षक अभियंता श्रीमती अलका आहेरराव, कार्यकारी अभियंता सागर शिंदे, मुख्याधिकारी शांताराम गोसावी, पाटील, गोदावरी डावा कालवा उपअभियंता थोरात आदी उपस्थित होते.