नवीन नाशिक l New Nashik (प्रतिनिधी) :
प्रभाग क्र. 24 मधील बडदे नगर येथील स्वामी समर्थ उद्यानातील खेळण्या तुटून, गाजर गवत वाढल्याने अस्वच्छता पसरून उद्यानाची दुरवस्था झाली आहे. याठिकाणी स्वच्छतेची मागणी करूनही स्वच्छता होत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
बडदे नगर येथे असलेल्या स्वामी समर्थ केंद्र येथील उद्यानातील लहान मुलांसाठी लावण्यात आलेल्या खेळण्या तुटून अस्ताव्यस्त पडलेल्या आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात गाजर गवत उगवल्याने डासांचे साम्राज्य वाढले आहे. या ठिकाणी कचरा फेकल्याने परिसरात दुर्गंधीयुक्त वातावरण पसरले आहे. उद्यानामध्ये डेब्रिस साचून उद्यानाला बकाल रूप आले आहे.
या उद्यानात स्वामी समर्थ केंद्र आहे, केंद्रामध्ये सेवा करण्यासाठी महिलावर्ग कायमस्वरूपी येत असतो. येताना जाताना कायमच दुर्गंधीचा सामना करावा लागत असल्याने स्वच्छता करण्यासाठी सांगितले असता लोकप्रतिनिधी पाहणी करून आश्वासन देऊन निघून जातात मात्र कामे करत नाहीत असा आरोप येथील नागरिकांनी केला आहे.
तरी लोकप्रतिनिधी व मनपाने उद्यानाची स्वच्छता करून खेळण्यांची दुरुस्ती करून द्यावी, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.