नाशिक । प्रतिनिधी Nashik
नाशिक व नाशिकरोडच्या सीमेवरील प्रभाग 16 Ward 16 मध्ये अनेक भागात मूलभूत सुविधांचा अभाव आहे. मोकळ्या भूखंडांवर घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. कॉलनी रस्त्यांंची स्थिती बिकट बनली आहे. गेल्या काही वर्षात परिसरात अवैध धंद्यांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात झाला आहे. या सर्व समस्यांनी नागरिक त्रस्त आहेत.
उपनगर Upnagar, ड्रीम सिटी Deream City , टाकळी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, वाडी, बजरंग वाडी, व्यंकटेश नगर, दत्त मंदिर व कॉलनी, गांधीनगर, गौतमनगर आदी भाग प्रभाग 16 मध्ये समाविष्ट होते.
भल्या मोठ्या क्षेत्रात विस्तारलेल्या प्रभाग 16 मध्ये प्रामुख्याने आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत आहे. पथदीप, पाणी पुरवठा, अस्वच्छता, घंटागाडी वेळेवर न येणे, वाहतूक कोंडी असे प्रश्न आहे. या प्रभागाला दिग्गज नगरसेवक लाभले तरी लोकांच्या अपेक्षा पूर्ण झाल्याचे दिसत नाही.
प्रभागात अनेक ठिकाणी मोकळे भूखंड पडले आहे. यामध्ये अनेक ठिकाणी जुगार, दारुचे अड्डे निर्माण झाले आहे. यामुळे स्थानिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो.
गौतमनगरसह विविध भागातील सार्वजनिक मुतारी, शौचालयांची दुरवस्था झाली आहे. मनपाचे सेवक या ठिकाणी सफाई करण्यासाठी येत नाही.
सुसज्ज असे मोठे रुग्णालय नव्याने होणे अपेक्षित होते, मात्र तसे झालेले नाही.
ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे, तर विद्युत पुरवठा सतत खंडित होते. यामुळे शिक्षणाचे नुकसान होते.
परिसरातील मनपाचे समाज मंदिर, सभागृहांना कोणीच वाली नाही. यामुळे बकाल अवस्था झाली आहे. गोरगरीब, मध्यमवर्गीयांसाठी मनपाचे सभागृह होते. मात्र नियमित सफाई होत नसल्याने गोरगरिबांचे नुकसान होते.
भव्य व आधुनिक जॉगिंग ट्रकची मागणी कायम आहे.
शांती पार्क परिसरातील सभागृहाची अवस्था बिकट आहे.
कॉलनी रस्त्यांकडे विशेष लक्ष दिले गेले नाही. यामुळे अनेक ठिकाणी कच्चे रस्ते आहे. यामुळे पावसाळ्यात त्यात खड्डे पडून पाणी साचते. यामुळे सतत लहान मोठे अपघात होता. त्याचप्रमाणे साचलेल्या पाण्यात डास, मच्छर तयार होऊन रोगांना आमंत्रण मिळते.
रस्त्यांवर सुशोभीकरण झालेले नाही. विजय-ममता समोरून जाणार्या मार्गाच्या मध्ये नाला वाहतो, मात्र त्यातून सतत दुर्गंधी निर्माण होते. या ठिकाणाहून ये-जा करणार्यांसह रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो.
अनेक ठिकाणी दुभाजकांवर जाळ्या नाहीत, ज्या ठिकाणी होते. त्या ठिकाणी तोडमोड झाली आहे.
उपनगर भाजी बाजार परिसरात टवाळखोरांचा त्रास आहे.
येथील अनेक भागात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे.
मोकळे भूखंड पडून असल्याने त्या ठिकाणी घाण, कचरा जमा झालेला आहे. यामुळे रोगराईला आमंत्रण मिळते.
स्थानिक नगरसेवकांनी प्रभागात विशेष लक्ष दिले नाही. हवा तसा विकास झालाच नाही. प्रभागात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू झाले आहेत. तरुण पिढी व्यसनात अडकत आहे. पोलीस दबावाखाली काम करीत आहेत का असा प्रश्न पडतो. मनपाचे सभामंडप, हॉलच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याने त्यांना बकाल स्वरूप आले आहे. गौतमनगरसह विविध भागातील शौचालयांची दुरवस्था झाली आहे. जुगाराचे अड्डे मोकळ्या भूखंडांवर सर्रास सुरू आहेत. महिलावर्ग घरातील कचरा आणत नाही तोपर्यंत मनपाची घंटागाडी पुढे निघून जाते. मोकळ्या जागांची देखभाल होत नाही. – कुणाल वाघ