पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner
करोनामुळे दोन वर्षे यात्रा उत्सव बंद होता. आता दोन वर्षांच्या कालखंडानंतर पारनेर तालुक्यातील वाळवणे भैरवनाथांच्या यात्रोत्सावाची सोमवारी हगाम्याने सांगता झाली.
पारनेर तालुक्यात दोन वर्षाच्या कालखंडानंतर झालेल्या भैरवनाथ यात्रा उत्सवाची देवस्थान ट्रस्ट व वाळवणे ग्रामस्थ यांनी मोठी तयारी केली होती. भाविकांना दर्शनाचा सुलभ वातावरणात लाभ व्हावा, यासाठी बॅरीकेटसह वेगवेगळ्या दर्शन बार्या सुरू करण्यात आल्या होत्या. तर विक्रेत्यासाठी मिठाई विभाग, नारळ पान, फुले, खेळणी आणि जनरल साहित्य असे वेगवेगळे विभाग करत सुटसुटीत व्यवस्था करण्यात आली होती. यामुळे भाविकांची गर्दी विभागण्यास मदत झाली. दोन वर्षानी यात्रा भरत असल्याने मोठ्या संख्येने भाविक आले होते.
रविवारी रात्री संपूर्ण वाळवणे गावच्या आजुबाजुच्या शेतांनी जत्रेसाठी तंबु टाकलेले दिसत होते. वाळवणे येथे येथे यात्रेला मोठी गर्दी होण्यचा अंदाज घेऊन सुपा पोलिसांनी वाहतुकीचे नियोजन केले होते. वाळवणे गावात व पलिकडे जाणारी वाहने दुसरीकडे वळवली तर काही वाहने गावाबाहेर दुरवरच अडवली. रविवार आणि सोमवारी सुपा वाळवणे परिसरातील अनेक गावांच्या यात्रा असल्याने सुपा बसस्थानक चौक व नगर-पुणे महामार्ग बराच वेळा पूर्णपणे बंद झाला होता.
सांयकाळी तर सुपा चौकात वाहतूक कोंडी झाली होती. दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. काल दुपारी चारनंतर कुस्त्यांच्या जंगी हगाम्याला सुरुवात झाली. वाळवणे येथील हंगामा राज्यात प्रसिद्ध असल्याने राज्यभरातून मल्ल वाळवणेत कुस्तीसाठी आले होते. कुस्ती जिंकणार्यांना लाखो रुपयांचे बक्षीस देण्यात आले.