पाथर्डी (तालुका प्रतिनिधी) –
राज्यात 72 लाख मेट्रिक टन साखर साठा शिल्लक आहे. यावर्षीच्या गाळप हंगामात पुन्हा शंभर लाख मेट्रिक टनाची त्यात भर पडेल. त्याचा साखर दरावर
परीणाम जाणवणार आहे. त्यामुळे इथेनॉल प्रकल्प लवकरच कार्यान्वित करण्याचा वृधेश्वरचा मानस आहे, असे प्रतिपादन जिल्हा परीषद सदस्य तथा वृध्देश्वर कारखान्याचे संचालक राहुल राजळे यांनी केले.
तालुक्यातील श्रीवृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचा बॉयलर अग्नीप्रदीपन गुरुवारी पाच ज्येष्ठ सभासद पती पत्नींच्या हस्ते विधिवत करण्यात आला.त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार आप्पासाहेब राजळे होते. उपाध्यक्ष रामकिसन काकडे, ज्येष्ठ सभासद शिवाजीराव कराळे, साहेबराव सातपुते, उत्तमराव नलवडे, विठ्ठलराव कोलते, बापूसाहेब घोरपडे ,बाबासाहेब गर्जे, ज्येष्ठ संचालक उद्धवराव वाघ, पांडुरंग खेडकर, शरद अकोलकर, सुनील पुंड, पोपटराव कराळे मंचावर होते. यावर्षीचे विपुल पर्जन्यमान, उसाची उपलब्धता गळीत हंगामासाठी पुरक आहेत. सात ऊसतोडणी यंत्रांची सज्जता ठेवली आहे.
कृषी व रसायन विभागाच्यावतीने पृथ्थःकरण करूनच ऊस तोडला जाईल, जेणेकरून गाळपासाठी परीपक्व ऊस येईल, असे स्पष्ट करून राजळे म्हणाले, कारखाना अंतर्गत मशिनरी, गव्हाण, बॉयलरमध्ये आधुनिक बदल केले आहेत. उत्पादन क्षमतेचा सर्वांगीण वापर करीत प्रतीदिन गाळप वेगाचे सातत्य व चांगला साखर उतारा ठेवून कमी दिवसांतच सुमारे साडेपाच लाख मेट्रिक टन ऊस गाळप केले जाईल, जेणेकरून नफ्यांच्या गणितांची जुळवणी होईल, असा संचालक मंडळाचा प्रयत्न राहणार आहे.
संस्थापक स्व. दादापाटील राजळे व माजी आमदार राजीव राजळे यांचे प्रारंभी मान्यवरांचे हस्ते प्रतीमापूजन झाले. विविध अपघात विमा धनादेशांचे वितरण करण्यात आले. लेखापाल संभाजी राजळे, प्रशासकीय अधिकारी विनायक म्हस्के, रुबाब शेख आदींसह शेतकरी, सभासद, कारखाना कामगार, कर्मचारी सामाजिक अंतर पाळून उपस्थित होते. प्रास्ताविक जेष्ठ संचालक उद्धवराव वाघ यांनी केले. तर पांडुरंग खेडकर यांनी आभार मानले.