Friday, April 26, 2024
Homeनगरबंदी शाळेचे रुपांतर संधी शाळेत व्हावे - विवेक सावंत

बंदी शाळेचे रुपांतर संधी शाळेत व्हावे – विवेक सावंत

संगमनेर |प्रतिनिधी| Sangmner

राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या शिक्षण क्षेत्रातील विचारांनी जगात परिवर्तन झाले. त्यामुळे हे शाश्वत विचार घेऊन भारतामध्येही मोठे परिवर्तन होणे सहज शक्य आहे.

- Advertisement -

यासाठी वंचितांच्या शिक्षणासाठी नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग केला आणि सध्याच्या बंदी शाळेचे रुपांतर संधी शाळेत केले तर देशात आमूलाग्र बदल घडेल, असा विश्वास ज्येष्ठ संशोधक आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ विवेक सावंत यांनी व्यक्त केले आहे.

जयहिंद लोकचळवळीच्यावतीने आयोजित ग्लोबल कॉन्फरन्समधील ‘शिक्षण प्रणाली’ या परिसंवादात ते बोलत होते. यावेळी डीआरडीओचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अजय पोद्दार, कृतिशील शिक्षक भाऊसाहेब चासकर, अग्नेक्शा स्पायनिस्वा (पोलंड), सबरिना चौधरी (बांगलादेश), अरिफ रेहमान (पाकिस्तान), संदीप वाकचौरे, रिशिका राका, पदवीधर मतदारसंघाचे आ. डॉ. सुधीर तांबे यांनी सहभाग घेतला.

तर व्यासपीठावर आ. डॉ. सुधीर तांबे, उत्कर्षा रुपवते, अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, संदीप खताळ, डॉ. सुरज गवांदे आदी उपस्थित होते.

विवेक सावंत म्हणाले, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारातून जगात मोठे परिवर्तन झाले आहे. हे परिवर्तन भारतात कृतिशीलतेतून अनुकरण केल्यास भारतामध्येही मोठे परिवर्तन घडेल. कारण शिक्षण हे समाज परिवर्तनाचे मुख्य साधन आहे. मात्र आजही ग्रामीण भागातील अनेक गरीब मुले शिक्षणापासून वंचित आहेत.

या सर्वांना बंदी शाळेतून संधी शाळेत आणणे अत्यंत गरजेचे असून रोजगाराभिमुख शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांना आवड असलेल्या क्षेत्रांमध्ये करिअरच्या संधी निर्माण करून देण्यासाठी शासनाने, विविध स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेतला पाहिजे. याचबरोबर नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना करून दिल्यास हे विद्यार्थी नक्कीच यशस्वी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

डीआरडीओचे संशोधक डॉ. अजय पोद्दार म्हणाले, महात्मा गांधीजींच्या विचारांची प्रभावी अंमलबजावणी भारतामध्ये अत्यंत तातडीने होणे गरजेचे आहे. त्यांच्या विचारातून जगाने क्रांती केली. मग भारतही त्यांच्या विचारातून नक्कीच शैक्षणिक क्रांती करू शकतो. आज आर्थिक विषमता संपवून शिक्षणाच्या माध्यमातून सर्व लोक एकाच व्यासपीठावर येऊ शकतात.

शिक्षण हेच समाज बदलाचे प्रभावी माध्यम आहे. म्हणून त्यावर मूल्याधारित शिक्षण व रोजगाराभिमुख शिक्षण देणे अत्यंत गरजेचे आहे. संधी खूप आहेत, त्याचा उपयोग ग्रामीण भागापर्यंत करून दिला गेला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले

कृतिशील शिक्षक भाऊसाहेब चासकर म्हणाले, करोना संकटामुळे सर्व शाळा ऑनलाईन सुरू आहेत. मात्र आदिवासी भागात वाडी-वस्तीवर आजही रेंज उपलब्ध नसल्याने किंवा अत्याधुनिक साधने उपलब्ध नसल्याने अनेक मुले शिक्षणापासून वंचित आहेत. यासाठी ही शिक्षणाची गंगा आदिवासीच्या वाडी-वस्तीपर्यंत देण्यासाठी अधिक काम केले पाहिजे.

बांगलादेशच्या सबरिना चौधरी म्हणाल्या, प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता भरपूर असते. मात्र त्याला वाव देणे अत्यंत गरजेचे आहे. त्या विद्यार्थ्यांपर्यंत नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केला गेला पाहिजे. संख्या वाढविण्यापेक्षा गुणवत्ता वाढविणे अत्यंत गरजेचे असल्याचेही त्या म्हणाल्या.

आ. डॉ. तांबे म्हणाले, कोणत्याही शासनाचा शिक्षणावर जास्त खर्च होणे अपेक्षित आहे. परंतु सध्या तसा तो होत नाही. शिक्षणामुळे व्यवस्थेतील गरीब आणि श्रीमंत असे दोन स्तर कमी होतील. सध्या इंग्रजी माध्यमांकडे वाढणारा कल हा जास्त आहे. मात्र ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रभावी इंग्रजीचे शिक्षण मिळाले तर ते चांगल्या प्रकारे यशस्वी होऊ शकतात, असेही ते म्हणाले. सूत्रसंचालन कृतीशिल शिक्षक संदीप वाकचौरे व उत्कर्षा रुपवते यांनी केले तर संदीप खताळ यांनी आभार मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या