विंचूर । प्रतिनिधी Nashik
शहराला करोनाचा विळखा वाढत चालला असून मंगळवारी एकाच दिवसात दोन करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण असून ग्रामपालिकेने आजपासून पुढील पाच दिवस गावात कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय घेतला आहे.
येथील ग्रामपालिकेचे माजी सरपंच असलेल्या ७१ वर्षीय पुरुषाला नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. तेथे त्यांची प्रकृती खालावल्याने उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. तर दुसरा रुग्ण हा ५४ वर्षीय असून ग्रामपालिकेच्या विद्यमान सरपंच यांच्या कुटुंबातील आहे. या रुग्णास ३१ जुलै रोजी त्रास होऊ लागल्याने त्यास नाशिक जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले होते.
परंतु त्यास श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यास मविप्रच्या आरोग्य विद्यापीठात दाखल करण्यात आले. सोमवारी सायंकाळी उपचारादरम्यान या रुग्णाचे निधन झाले. विंचूरसारख्या छोट्या शहरात एकाच आठवड्यात करोनाचे तीन बळी गेले. त्यामुळे करोनाचे गांभीर्य लक्षात घेत विंचूर येथे बुधवार ते रविवार (दि.९) पर्यंत कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.