“महाविकास आघाडी निवडणुकीपूर्वीच ठरवलेली, एकनाथ शिंदेंच्या मनात…”; शिंदे गटाच्या माजी मंत्र्याचा गौप्यस्फोट

मुंबई । Mumbai

शिंदे यांच्या मनात उठावाचे बीज मीच पेरलं होतं असं सांगतानाच महाविकास आघाडी निवडणुकीपूर्वीच झाली होती, असा दावा माजी मंत्री व शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून अनेक तर्कवितर्क वर्तविले जात आहेत.

विजय शिवतारे बोलताना म्हणाले की, ‘२०१९ मध्ये राज्यात जे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झालं, ते राज्याच्या हिताचं नव्हतं. पहिल्या दोन महिन्यातच उचल खाल्ली होती. हा उठाव करायचं बीज एकनाथ शिंदेच्या डोक्यात विजय बापू शिवतारेंनी घातलं. उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी निवडणुकीपूर्वीच ठरवली होती, असा आरोप विजय शिवतारे यांनी केला आहे.

तसेच, ‘महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर दोन महिन्यांनीच मी एकनाथ शिंदेंना घेऊन नंदनवन येथे बसलो होतो. मी तेव्हाच त्यांना सांगितलं की, राज्यात जे सुरू आहे, ते महाराष्ट्राच्या हिताचं नाही, जे चाललं आहे ते चुकीचं आहे. तुम्ही उद्धव ठाकरेंना सांगा की ही महाविकास आघाडी तोडली पाहिजे. राज्यात शिवसेना भाजपाचे सरकार आले पाहिजे, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली होती.