वावी | Vavi
वावीसह अकरा गावे पाणी पुरवठा योजनेच्या पिल्टर प्लांटची वावी येथल सरपंच व सदस्यांकडून पाहणी करण्यात आली असता सध्य परिस्थितीत फिल्टर प्लांट बंद अवस्थेत असल्याचे यावेळी आढळून आले.
थेट तळ्यातील अशुद्द पाणी अकरा गावांना पाठविण्यात येत असून नुकताच दुरुस्तीसाठी वापरलेला २७ लाख रुपयांचा निधी गेला कुठे असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला.
वावीसह अकरा गावे पाणीपुरवठा योजना सद्यस्थितीत पंचायत सतिी प्रशासनाच्या अधिपत्याखाली चालवली जात असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे योजनेची परवड होत असल्याचा प्रकार समोर आला आहे.
२०१२ मध्ये आ. माणिकराव कोकाटे यांच्या पुढाकारातून ही योजना मार्गी लागली. पाथरे बुद्रुक, पाथरे खुर्द, वारेगाव वावी, सायाळे, मलढोण, दुसंगवाडी, कहांडळवाडी, मिरगाव आणि मिठसागरे या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न योजनेमुळे मार्गी लागला आहे. असे असले तरी योजनेतील तांत्रिक त्रुटींमुळे सुरुवातीपासूनच ही योजना असून फायदा न तोटा असल्यागत सुरू आहे.
परिणामी होणारा पाणीपुरवठा दूषित व पिण्यास अशुद्ध पाणी मिळत असल्याने ग्रास्थांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी खाजगी आरओ प्लांट वर अवलंबून राहावे लागत आहे. नळाद्वारे सोडण्यात येणारे पाणी केवळ वापरासाठी भरून ठेवण्यात येते.
वर्षभरापूर्वी जिल्हा परिषद सदस्य सिमंतिनी कोकाटे यांच्या प्रयतत्नांतून जिल्हा वार्षिक योजनेतून या योजनेच्या दुरुस्ती कामासाठी जवळपास 27 लाख रुपये निधी उपलब्ध करुन देण्यात आला. हे काम आठ महिन्यांपूर्वी पूर्ण झाल्याचे सांगितले जाते.
मात्र, तरीदेखील योजनेतून शुद्ध पाण्याचा पुरवठा होत नसल्याने योजनेची परिस्थिती पाहण्यासाठी गेलेल्या वावी येथील ग्रामपंचायतीच्या पदाधिकार्यांना योजनेचा सावळा गोंधळ पहावयास मिळाला. फिल्टर प्लांटच्या ठेकेदाराने केवळ पैसे उकळण्याचा गोरख धंदा केला असून त्याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली.