Friday, April 26, 2024
Homeनगरशासन आदेशापर्यंत प्रचलित पद्धतीने वाराई

शासन आदेशापर्यंत प्रचलित पद्धतीने वाराई

अहमदनगर | प्रतिनिधी

वाराईच्या प्रश्नासंदर्भात जोपर्यंत शासनाचा निर्णय होत नाही तो पर्यंत प्रचलित पद्धत चालू ठेवण्याची ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. याप्रकरणी व्यापाऱ्यांवर कुठल्याही प्रकारचे गुन्हे दाखल होणार नाही, असे आश्वासन त्यांनी व्यापारी शिष्टमंडळास दिले.

- Advertisement -

जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी आ.संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली वाराईच्या प्रश्नासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची भेट घेतली. बाजारपेठेतील प्रचलित पद्धत चालू ठेवावी, अशी मागणी करत पोलीस प्रशासनाकडून व्यापाऱ्यांवर दाखल होत असलेले गुन्हांबाबत चर्चा केली. यावेळी संतोष सूर्यवंशी, मारुती रेपाळे, मा. नगरसेवक निखिल वारे, पारनेर बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड बाजार समितीचे संचालक राजेंद्र बोथरा, सुरेश बाफना, बापूसाहेब गवळी, सुदाम तागड, बबन बेल्हेकर, नंदकुमार शिखरे, पारस लोढा, अभिजीत बोरुडे, विकी वाघ तसेच यावेळी विविध व्यापारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

‘ज्याचा माल त्याचा हमाल’ ही मागणी घेऊन ट्रान्सपोर्ट संघटना काही दिवसांपासून बाजारपेठेतील वातावरण बिघडवत आहेत. कोणत्याही मालाची वाहतूक करतांना त्याचे मोटार भाडे, ट्रान्सपोर्ट वाले व मोटार मालक हे एकूण अंतर, डिझेल खर्च, वाराई रक्कम, टोलनाके, काटा पावती गृहीत धरून ठरवितात. गेल्या अनेक वर्षांपासून ही पद्धत संपूर्ण देशात व सर्व प्रकारच्या मालवाहतुकीसाठी प्रचलित आहे. परंतु माथाडी मंडळाच्या शासनाने दिलेल्या एका कृती आराखड्याचा चुकीचा अर्थ लावून ट्रान्सपोर्ट संघटना बाजारपेठेत अशांतता निर्माण करीत आहेत. तसेच सदरचा कृती आदेश हा फक्त माथाडी मंडळाने २०१६ साली काढलेला आहे. हा कृती आदेश हा माथाडी मंडळात अनिष्ट प्रथा मुंबई अधयोदिक परिसरात घडत होत्या, त्याला प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने आदेश काढला आहे. या आदेशाचा चुकीचा अर्थ काढून ट्रान्सपोर्टवाले बाजारपेठेत अशांतता निर्माण करत आहेत तरी याला पायबंद घालावा, अशी मागणी या व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या