राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri
ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राहुरी तालुक्यातील वांबोरी मंडळात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती या अतिवृष्टीमुळे शेतकर्यांच्या शेत पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त शेतकर्यांना भरपाई मिळावी म्हणून शासन दरबारी प्रयत्न करण्यात आले .त्या प्रयत्नास सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने सुमारे 44 लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाले असून संबंधित शेतकर्यांच्या बँक खात्यावर रक्कम वर्ग झाली असल्याची माहिती माजी राज्यमंत्री व विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे यांनी दिली.
अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, वांबोरी मंडळात धामोरी खुर्द, धामोरी बुद्रुक, खडांबे खुर्द, खडांबे बुद्रुक, बाभुळगाव, वरवंडी, सडे, कुक्कडवेढे, कात्रड, गुंजाळे व वांबोरी या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन शेत पिकांचे नुकसान झाले होते.
सुमारे 105 मिलिमीटर पाऊस पडला होता. शासन नियमाप्रमाणे जिरायत भागासाठी हेक्टरी 13 हजार 600 रुपये तर बागायतसाठी हेक्टरी 27 हजार रुपये तर फळ पिकांसाठी हेक्टरी 36 हजार रुपये असे अनुदान जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार वांबोरी मंडळात 454 हेक्टर क्षेत्रासाठी 44 लाख रुपये अनुदान मिळाले आहे. नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करावे व भरपाई मिळावी म्हणून शेतकर्यांनी आ. तनपुरे यांचेकडे मागणी केली होती. आ. तनपुरे यांनीही शासनदरबारी पाठपुरावा करून अनुदान मिळवून दिले. संबंधित शेतकर्यांनी आ.तनपुरे यांचे आभार मानले.