Thursday, April 25, 2024
Homeनाशिकवालदेवी धरण सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

वालदेवी धरण सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

नवीन नाशिक | निशिकांत पाटील

वालदेवी धरण परिसरात भ्रमंतीसाठी येणाऱ्या पर्यटकांना पोहता येत नसतांनाही विनाकारण पाण्यात उतरण्याचा अतिउत्साह त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरतो आहे.

- Advertisement -

वालदेवी धरणात गेल्या वर्षभरात दहा ते बारा जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. तरीही जिल्हा प्रशासन तसेच पाटबंधारे विभागाकडून या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना केल्या जात नसल्याने स्थानिक गावकऱ्यांसह पोलीस प्रशासनाला कायमचीच डोकेदुखी झाली आहे.

नाशिक शहरापासून मुंबईच्या दिशेने जात असताना पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर वालदेवी धरण आहे. या ठिकाणी नाशिक शहरासह नवीन नाशिक, पाथर्डी फाटा, इंदिरानगर, अंबड परिसरातील अनेक तरुण युवक व युवती निसर्गरम्य वातावरणाच्या सानिध्यात पाण्यात भिजण्याचा आनंद घेण्यासाठी वालदेवी धरणावर जातात.

अतिउत्साहाच्या भरात धरणात पोहण्यासाठी उतरतात. मात्र पोहोता येत नसताना खोलीचा अंदाज न आल्याने अनेक युवक-युवतींचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या घटना येथे वारंवार घडत आहे. गेल्या वर्षभरात दहा ते बारा तरुणांचा धरणात बुडून मृत्यू झाल्याने ठिकाणी सुरक्षिततेबाबत च्या उपाय योजना सुरक्षा रक्षक लाईफ गार्ड नेमण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून होत आहे.

धरणात बुडून मृत्युमुखी पडणाऱ्या मध्ये उच्चशिक्षित तरुणांचा समावेश असून अतिउत्साह मृत्युला कारणीभूत ठरत आहे. गेल्या दोन महिन्यातच ७ युवक व युवतींचा धरणात बुडाल्याने मृत्यू झाला असल्याने सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

स्थानिक ग्रामस्थ व पोलीस प्रशासनाने पाटबंधारे विभागाला वारंवार पत्रव्यवहार करून देखील या ठिकाणी सुरक्षिततेबाबत अशा कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याने याठिकाणी अनेकांचे बळी जात आहे.

पावसाळा सुरू झाला आहे शनिवार रविवार निसर्गाच्या सानिध्यात आनंद घेण्यासाठी धरण परिसरात तरुणांची मोठी गर्दी असते. या ठिकाणी मद्यपान करण्यासाठी अनेक तरुण येतात मद्यपान केल्यानंतर त्यांना पाण्यात उतरण्याचा मोह आवरत नाही,

यासाठी लवकरात लवकर पाटबंधारे विभाग, तसेच जिल्हा प्रशासनाकडून, तुम्हाला पोलिस प्रशासनाने समन्वय साधून धरण परिसरात सुरक्षितते बाबतचे फलक, सुरक्षारक्षक, लाईफगार्ड, सीसीटीव्ही कॅमेरे या प्रकारच्या सुरक्षिततेच्या उपाययोजना राबवणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा पाण्यात बुडून मृत्यू होण्याचे प्रमाण वाढतच राहील.

- Advertisment -

ताज्या बातम्या