अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
उत्तर प्रदेशातील हाथरस येथील दलित तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचा अहमदनगर शहर व भिंगार शहरातील वाल्मिकी मेहेतर
समाजच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध नोंदविण्यात आला. तर निदर्शने करून निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी वाल्मिकी मेहतर समाजाचे दीप चव्हाण, विजय छजलानी, अनिल मट्टू, रवींद्र मोरकरोसे, प्रवीण घावरी, अनिल तेजी आदी उपस्थित होते.
उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील चंदपा येथे राहणार्या दलित तरुणीवर अत्याचाराची घटना घडली. उपचार सुरू असताना या पीडित तरुणीची प्राणज्योत माळवली. या घटनेची माहिती मिळून देखील उत्तरप्रदेश पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली होती. तर पोलिसांनी पीडितेच्या मृतदेहावर तिच्या नातेवाईकांना न सांगता परस्पर अंत्यसंस्कार केला.
उत्तर प्रदेश पोलिसांनी आपली कामगिरी चोखपणे निभावली नसल्याने या घटनेचा निषेध वाल्मिकी मेहेतर समाज करीत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात यावा, हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, पीडित तरुणीच्या कुटुंबीयांना 1 कोटीची आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान उत्तरप्रदेशात हाथरस येथे काँग्रेस नेते राहुल गांधी यांना उत्तरप्रदेश पोलिसांकडून धक्काबुक्की आणि अटकेच्या निषेधार्थ अहमदनगर येथे युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिल्ली दरवाजा येथे निदर्शने केली. यूपी सरकार हाय-हाय, योगी सरकार हटाव, देश बचाव अशा घोषणा देत आंदोलन केले.
गांधी हे हाथरस येथे अत्याचार प्रकरणातील पीडित कुटुंबाला भेटण्यासाठी जाणार होते. हे आंदोलन सुरू असताना पोलीस दाखल झाले आणि त्यांनी निदर्शने करणार्या युवक काँग्रेसच्या आंदोलकांना जबरदस्तीने ताब्यात घेतले. यावेळी युवक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष मयुर पाटोळे, युवक काँग्रेसचे उपशहर जिल्हाध्यक्ष गणेश भोसले, एनएसयूआयचे शहराध्यक्ष दानिश शेख आदी कार्यकर्ते उपस्थित होते.