नाशिक | प्रतिनिधी
राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांत तब्बल चार हजार प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) वेळोवेळी निर्देश देऊनही शासनाने ही पदे भरलेली नाहीत. त्यामुळे महाविद्यालयांवर कडक कारवाई करण्याचे अधिकार युजीसीकडे असल्याचे यूजीसीचे उपाध्यक्ष डाॅ. भूषण पटवर्धन यांनी स्पष्ट केले…
आजवर त्याचा वापर करण्यात आला नाही. मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने प्राध्यापकांची पदे न भरणाऱ्या महाविद्यालयांची मान्यताच काढून घेतली आहे. तसेही यूजीसी करू शकते, असा इशारा डॉ. पटवर्धन यांनी दिला आहे.
नव्या शैक्षणिक धोरणासह संशोधन, प्राध्यापक भरती, बदलती शिक्षण पद्धत आदी गोष्टींवर त्यांनी चर्चा केली. प्राध्यापक भरतीचा प्रश्न उपस्थित केला असता त्यांनी माहिती दिली. महाराष्ट्र शासनाला वेळोवेळी प्राध्यापक भरतीसाठी परिपत्रके पाठविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. असे असूनही आजही चार हजार प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत.
राज्याच्या शैक्षणिक विकासाच्या दृष्टीने ही अत्यंत मारक गोष्ट आहे. प्राध्यापकांची भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सक्षम व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे डॉ. पटवर्धन यांनी स्पष्ट केले. राज्यातील अनेक महाविद्यालयांमध्ये लाखो रुपये घेऊन प्राध्यापकांची पदे भरली जातात. हे उघड सत्य आहे.
यासंबंधी डॉ. पटवर्धन यांना त्यांचे मत विचारले असता राज्य शासनाने प्राध्यापक भरती अधिक सक्षम आणि पारदर्शक करणे गरजेचे असल्याचे म्हटले. यासाठी आम्हीही सातत्याने प्रयत्न करत असून हा विषय खूप दिवस लावून धरावे लागणार असल्याचेही त्यांनी म्हटले.