Saturday, April 27, 2024
Homeनगरउंबरी बाळापूर ग्रामपंचायतीवर पिण्याच्या पाण्यासाठी हंडा मोर्चा

उंबरी बाळापूर ग्रामपंचायतीवर पिण्याच्या पाण्यासाठी हंडा मोर्चा

आश्वी |वार्ताहर| Ashwi

ऐन पावसाळ्यात मागील पंधरा दिवसांपासून संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर येथील ग्रामस्थांना पिण्याचे पाणी केवळ नावालाच येत असल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी काल ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढला. यावेळी ग्रामपंचायत प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनानंतर मोर्चा शांततेत स्थगित करण्यात आला.

- Advertisement -

गावाच्या चारही दिशाला पाण्याचा मोठा साठा आहे. गावाजवळून प्रवरा नदी बरोबरच मध्यभागातून प्रवरा डावा वाहत आहे. परंतु गावातील नागरिकांना मागील पंधरा दिवसांपासून तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. ग्रामपंचायत मार्फत नियमित होणार्‍या पाणीपुरवठ्याकडे ग्रामपंचायत प्रशासन तसेच जनतेने निवडून दिलेले सदस्य दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी करत ग्रामपंचायतीचे सरपंच व प्रशासनाला यावेळी चांगलेच धारेवर धरले होते. यावेळी उपस्थित मोर्चेकर्‍यांनी पाणी आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे अशा जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला होता.

यावेळी गावातील सर्वसामान्य नागरिकाला पिण्याचे पाणी मिळत नाही, गावात मोठ्या प्रमाणात अस्वच्छतेमुळे साथीचे रोग प्रसार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लोकांचे आरोग्य लक्षात घेता औषध फवारणी करायला ग्रामपंचायतीकडे वेळ नाही. स्ट्रीट लाईट बंद राहणे, वाड्या वस्त्यांना जोडणार्‍या रस्त्यांची झालेली दुरवस्था, शालेय विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय यासारख्या मुलभूत प्रश्नाकडे लक्ष द्यायला ग्रामपंचायतीला वेळ नसल्याचा गंभीर आरोप उपस्थित ग्रामस्थांनी केला. यावेळी मुलभूत प्रश्नासंदर्भात काढण्यात आलेल्या मोर्चाला उत्तर देण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य आले नसल्याने मोर्चेकर्‍यांनी त्यांना शालजोडीतून चांगलेच फटकारले.

संतप्त नागरिकांनी पिण्याचे पाणी किमान 50 मिनीटे दररोज सोडण्यात यावे, पाणी येण्याची वेळ निश्चित करण्यात यावी व रात्री – अपरात्री पाणी सोडू नये, वारंवार विद्युत मोटार जळणे, लाईट नाही, पाईपलाईन फुटणे या कारणाबाबत योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात, पाणीपुरवठा विहीर याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात यावा व त्याचे सॉफ्टवेअर सरपंच व ग्रामसेवक यांच्या मोबाईलला कनेक्ट करावे, साथीच्या आजाराचा प्रसार होऊ नये यासाठी गावात औषध फवारणी करावी, गावासह वाड्या – वस्त्यांना जोडणार्‍या रस्त्यांची दुरवस्था झाल्याने मुरूम टाकण्यात यावा, ग्रामपंचायत पाणीपुरवठा कर्मचारी यांना योग्य नियोजन व पाणी सोडणेबाबत सूचना कराव्यात, स्ट्रीट लाईटचा प्रश्न मार्गी लावावा, अशा मागण्या याप्रसंगी करण्यात आल्या.

संतप्त झालेल्या नागरिकांशी सरपंच किरण भुसाळ, उपसरपंच नानासाहेब उंबरकर यांनी संवाद साधत येत्या दोन दिवसांत या समस्यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. मात्र नागरिक लेखी आश्वासनावर अडून बसल्याने ग्रामविस्तार अधिकारी राठोड यांच्या पुढाकारातून सरपंच व उपसरपंच यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर हा हंडा मोर्चा शांततेत स्थगित करण्यात आला. मात्र त्या दोन दिवसांत पाणी समस्या सोडवली न गेल्यास आक्रमक आंदोलनाचा इशारा यावेळी मोर्चेकर्‍यांनी दिला आहे.

याप्रसंगी रिपाइंचे तालुकाध्यक्ष आशिष शेळके, अ‍ॅड. रवी शेळके, एकलव्य संघटनेचे अनिल बर्डे तसेच ग्रामविस्तार अधिकारी राठोड, सरपंच किरण भुसाळ, उपसरपंच नानासाहेब उंबरकर, ग्रामसेवक मांढरे, भागवत उंबरकर, अनिल भुसाळ, विनायक शेळके, उल्हासराव गायकवाड, सुनील शिखरे, डॅनियल गायकवाड, राजेंद्र भुसाळ, सागर भुसाळ, लहानु डोखे, गणेश डोखे, दादू बर्डे, संजय बर्डे, सविता शेळके, शैला शेळके, शोभा शेळके, रंजना शेळके, आरती शेळके, कोमल शेळके, संगीता बर्डे, आशाबाई बर्डे, मंदा बर्डे, कमल बर्डे, उषा बर्डे, मिरा बर्डे, दया बर्डे, सुनीता माळी, हौसाबाई साळुंखे, अरुणा माळी, योगीता बर्डे, शोभा बर्डे, चंद्रभागाबाई बर्डे, ताराबाई बर्डे, अर्चना बर्डे, विमल बर्डे, छाया बर्डे आदींसह गावातील महिला, पुरुष व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान यावेळी मोर्चाला कोणतेही आक्रमक अथवा हिंसक वळण लागू नये यासाठी आश्वीचे पोलीस निरीक्षक सुभाष भोये, सहाय्यक फौजदार डी. डी. बर्डे, पोहेकॉ ए. डी. शिंदे, पो.कॉ पी. जे. दहिमिवाळ, पोकॉ निलेश वर्पे आदींसह पोलीस व होमगार्ड यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या