जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :
बोदवड तालुक्यातील एका गावात राहणार्या 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिला इंदूर (मध्य प्रदेश) येथे पळवून नेणार्या दोन तरुणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी सकाळी 9.30 वाजता ताब्यात घेतले. त्यांनी 7 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता मुलीचे अपहरण केले होते.
प्रकाश रतन बावस्कर (वय 22) व गणेश सुनील राणे (वय 19, दोघे रा. कोल्हाडी, ता. बोदवड) असे अटक केलेल्या तरुणांची नावे आहेत. या दोघांनी गावातच राहणार्या ज्योती (नाव बदललेले) या 13 वर्षीय मुलीचे अपहरण केले होते.
ज्योती, प्रकाश व गणेश हे तिघे एकाच गावात राहणारे व परिचित होते. 7 डिसेंबर रोजी सायंकाळी कोल्हाडी शिवारातील प्रमोद ढाके यांच्या शेतात प्रकाश व ज्योती यांची भेट झाली. त्यानंतर काही वेळातच प्रकाशने स्वत:ची दुचाकी आणून याच दुचाकीवरुन त्याने ज्योतीला पळवून नेले.
यावेळी त्यांच्यासोबत गणेशदेखील आला. गणेश याने बोदवड शहराच्या बाहेर एका पेट्रोल पंपवर दुचाकीत पेट्रोल भरले. यावेळी कोल्हाडी गावातील काही लोकांनी तिघांना पाहिले होते. याच दुचाकीने ते रात्रभरातून थेट इंदूर (मध्य प्रदेश) येथे निघून गेले.
इकडे कोल्हाडी गावात ज्योतीच्या कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. ती मिळून न आल्यामुळे बोदवड पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
ज्योती अल्पवयीन असल्यामुळे पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले. पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडे हा तपास सोपवला आणि दोन पथक तयार केली. एक पथक प्रकाशचा एक मित्र दौंड (ता. अहमदनगर) येथे असल्याने तो तिकडे पळून जाण्याची शक्यता होती.
त्यानुसार एक पथक दौंडला रवाना केले तर पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले, उपनिरीक्षक रवींद्र गिरासे, राजेंद्र पाटील, कमलाकर बागुल, दीपक पाटील, विजय पाटील, दिनेश बडगुजर, नरेंद्र वारुळे, अनिल देशमुख यांच्या पथकाने गणेश राणे याचे लोकेशन ट्रेस केले.
त्यानुसार या पथकाने थेट इंदूर गाठून प्रकाशसह तिघांना ताब्यात घेतले. पुढील कारवाईसाठी दोघांना बोदवड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.