नाशिक | Nashik (प्रतिनिधी)
करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहाता आदिवासी विभागाच्या नाशिक आणि कळवण प्रकल्पातील सर्व आश्रमशाळा, एकलव्य स्कूल ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवल्या जाणार आहेत.
आदिवासी विभागाच्या सर्वच आश्रमशाळा निवासी असल्याने शाळा सुरू करण्याचा निर्णय स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार घेण्याच्या सूचना सर्व शाळांना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार काही शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी-अधिक प्रमाणात होती.
काही शाळांमध्ये बाहेरून आलेले शिक्षकच कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले तर, नाशिक प्रकल्पातील इगतपुरी येथील शाळेतील मुलांना तर कनाशी येथील मुलींना कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आले होते.
यामुळे स्थानिक शिक्षण समितीनेही शाळा बंद करण्याबाबत प्रकल्प अधिकाऱ्यांना पत्र दिल्याने जिल्ह्यातील कळवण आणि नाशिक या दोन्ही प्रकल्पातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कनाशी आणि इगतपुरी येथील शाळांमध्ये कोरोनाची बाधा झालेले विद्यार्थी आणि विद्यार्थीनी यांना वेळीच उपचार मिळाल्याने हे सर्व विद्यार्थी सुखरुप आहेत. त्यांना घरी पाठविण्यात आले आहे.