अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
अहमदनगर शहरातील वाहतूकीची मोठी समस्या आहे. ही समस्या सोडविण्यासाठी आ. संग्राम जगताप यांनी पुढाकार घेतला आहे. आ. जगताप यांच्यासह पोलीस अधीक्षक मनोज पाटील, महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी कोठला परिसरासह महामार्गाची गुरूवारी पाहणी केली. रस्ता दुभाजक वाढविणे, अतिक्रमणे हटविणे आदींबाबत चर्चा केली. यावेळी शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले, नगरसेवक मुदस्सर शेख आदी उपस्थित होते.
शहरात सध्या उड्डाणपुल, रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्यामुळे वाहतूकीची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यातच अवजड वाहतूक शहरातून जात आहे. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. वाहतुकीमुळे अपघाताचे प्रमाण सुध्दा वाढत चालले आहे, ही बाब आ. जगताप यांनी यावेळी निदर्शनास आणून दिली. कोठला परिसरात सिग्नलची व्यवस्था करता येईल का, या संदर्भात चर्चा केली, तसेच फलटण गेट पोलीस चौकीपर्यंत दुभाजक वाढविण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या आहेत.
उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू होईल, त्यावेळी कोठला परिसरात वाहतुकीची कोंडी निर्माण होणार आहे, ही बाब लक्षात घेऊन आजूबाजूचे रस्ते मोठे करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या. अहमदनगर शहरात वाहतुकीची कोंडी होत असून ती दूर करावी, महामार्गावर दुभाजक टाकण्यासाठी पोलिसांची परवानगी लागते, सदर परवानगीसाठी पत्र देणार असल्याचे आ. जगताप यांनी सांगितले.