औरंगाबाद – Aurangabad
फ्रांसच्या टोटल एनर्जीज या कंपनीने राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या शिफारशीनुसार औरंगाबादेत बायोगॉस (जैवऊर्जा) प्रकल्प उभारण्यासाठी चाचपणी सुरु केली आहे. विशेष म्हणजे, यासाठी प्रसिद्ध उद्योगपती अदानी यांनी पुढाकार घेतला आहे. चाचपणी यशस्वी ठरल्यास औरंगाबादसह मराठवाड्यात मोठी गुंतवणूक होण्याचा अंदाज आहे.
फ्रान्स येथील टोटल एनर्जीज ही जगातील प्रमुख तेल कंपनी मानली जाते. या कंपनीने आता मराठवाड्यात व प्रामुख्याने औरंगाबादेत गुंतवणूक करण्याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. त्यादृष्टीने महापालिकेचे प्रशासक व औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट मुख्याधिकारी आस्तिककुमार पांडेय यांच्यासोबत ऑनलाइन बैठक झाली. या बैठकीला स्मार्ट सिटीचे आदित्य तिवारी, टोटल एनर्जीचे ज्यूल डिऔर, अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडचे प्रताप
मोंगा आणि इन्व्हेस्ट इंडियाचे वेदांत राज हे सहभागी झाले होते. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारत आणि फ्रान्स एकत्रितपणे संयुक्त राष्ट्रानंतर सौर गटात नेतृत्व करतात. याप्रसंगी पालिका आयुक्त पांडेय म्हणाले की, औरंगाबाद व मराठवाडा भाग सातत्याने दुष्काळसदृश्य परिस्थितीमुळे शेती करणारे लोक मोठ्या प्रमाणात पशुधनावर अवलंबून आहेत. कडक उन्हाळ्यात मराठवाड्यात वेगवेगळ्या भागात चारा छावण्या घेण्यात येतात. ज्या जैव ऊर्जा उत्पादनासाठी बायोमासचा चांगला स्रोत ठरू शकतील.
जैव ऊर्जा ही वायू प्रदूषण कमी करण्यासाठीही मोठ्या प्रमाणात मदत करू शकते. कारण जैव ऊर्जा उत्पादनासाठी पेंढा व इतर बायोमास या शेतातील अवशेष कच्चा माल म्हणून वापरता येतील, असे तिवारी म्हणाले. पालिका प्रशासन आणि औरंगाबाद स्मार्ट सिटीने सादर केलेल्या सादरीकरणामुळे एकूण गुंतवणूकीसाठी सकारात्मक संकेत देताना टोटल एनर्जीच्या प्रतिनिधींनी कच्च्या मालाच्या उपलब्धतेविषयीही अधिक माहिती मागविली आहे.
सादरीकरणादरम्यान, औरंगाबाद स्मार्ट सिटीने इंडो-फ्रान्स संबंधांवर प्रकाश टाकला. 1653 साली फ्रेंच प्रवासी आणि हिरा व्यापारी ट्रॅव्हिएनर औरंगाबादला आले होते. त्यांनी बीबी-का-मकबराच्या बांधकामासाठीची वाहतूक जवळून बघितली होती. औरंगाबादची श्रीमंती आणि वैश्विक संस्कृती पाहून ते चकित झाले होते. भारत आणि फ्रान्सची रणनीतिक भागीदारी, ऊर्जा संबंध आणि सांस्कृतिक संबंध यासह अन्य विषयांवर चर्चा झाली.