द्राक्षांचा खर्च वाढणार; टोमॅटोचेही नुकसान झाल्याने बळीराजाचा खिसा रिकामाच

jalgaon-digital
2 Min Read

ओझे | Oze

दिंडोरी तालुक्यात (dindori taluka) गेल्या आठ दिवसांपासून परतीच्या पावसाने (rain) धूमाकुळ घातल्यामुळे टोमॅटो (tomato) पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भावात वाढ होत असताना टोमॅटो खराब झाल्यामुळे शेतकरीवर्गाचा हिरमोड झाल्याचे चित्र दिसत आहे…

तालुक्यात सतत पडणारा पाऊस व सकाळी पडणारे धुके यांमुळे टोमॅटो पिक पिवळे पडल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जे टोमॅटो प्लॉट चांगले आहे त्यांना फुलगळ व फुलकुजीची समस्या निर्माण झाल्यामुळे पिकात मोठ्या प्रमाणात घट होताना दिसत आहे.

वातावरणात सतत होत असल्याने पिकांना हवामानाचादेखील फटका बसत आहे. महागड्या औषधाच्या फवारण्या करूनही फुलगळ, फुलकुज होत असल्याने बळीराजात निराशाजनक वातावरण निर्माण झाले आहे.

करोनामुळे (corona) द्राक्षबागांना फटका बसला असून तिसऱ्या हंगामातील द्राक्षबागांची गोडभार छाटणी अंतिम टप्यात आहे. मात्र पावसामुळे द्राक्षबागांच्या फवारणी खर्चात वाढ झाली असून पोंगा अवस्थेतील द्राक्षबागांना पावसाचा मोठा फटका बसला आहे.

पावसामुळे द्राक्षबाग मागेपुढे फुटतात त्याप्रमाणे घडसुद्धा अतिशय बारीक निघत आहे. द्राक्षबाग वाचविण्यासाठी बळीराजा जीवाचे रान करताना दिसत आहे. तसेच अनेक द्राक्षबागांमध्ये पावसामुळे फवारणी करण्यासाठी टॅक्टर चालत नाही. बागेत सर्वत्र पाणी व चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे.

द्राक्ष उत्पादक मोठा संघर्ष करून द्राक्षबाग वाचविताना दिसत आहे. सतत दोन हंगामात करोनाचा द्राक्ष उत्पादकांना फटका बसल्यामुळे भाडवंल उपलब्ध करण्याचे मोठे संकट शेतकरी वर्गा समोर उभी आहे.

त्यात भर म्हणजे रासायनिक खते व औषधाच्या किंमती गगनाला भिडल्यामुळे बळीराजाचे अर्थिक नियोजन कोलमडले आहे. गेल्या दोन हंगामात द्राक्षबागायदार वर्ग तोट्यात गेल्यामुळे रासायनिक खते व औषधाच्या दुकानात पत राहिलेली नाही.

अनेक दुकानदारांचे देणे बाकी असल्यामुळे जवळजवळ सर्वच कृषी केंद्रानी उधारी बंद केली आहे. सर्व शेतीचे व्यवहार रोखीत होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गापुढे भाडवल उभे करण्याचेदेखील मोठे आव्हान आहे.

आजही तज्ञांकडून तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे द्राक्षबागायतदारांना खर्च करूनही काळजी वाटत आहे. अनेक बागायतदारांना आपला माल शेतातच खुडून टाकावा लागल्याने अनेक शेतकरी द्राक्षबागेला खर्च करताना काळजावर हात ठेवून खर्च करत असल्याचे दिसत आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *