नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी ब्रिक्स देशांच्या संमेलनात सामील झाले होते. यावेळी मोदींनी पाकिस्तानवर निशाना साधला.
ब्रिक्सच्या व्हर्च्युअल समिटमध्ये बोलताना मोदी म्हणाले की, दहशतवाद ही सध्या सर्वात मोठी समस्या आहे. याचा सामना जगातील अनेक देशांना करावा लागत आहे. जे देश सध्या दहशतवादाचे समर्थन करत आहेत, त्यांना याचे उत्तर द्यावे लागेल. यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सनारो आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन उपस्थित होते.
ब्रिक्समध्ये ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रीका सामील आहे. यावेळेस संमेलनाची थीम ‘जागतिक स्थिरता, सामुहिक सुरक्षा आणि अभिनव विकास’ आहे. दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, पुढील ब्रिक्स शिखर संमेलनाचे अध्यक्षपद भारताकडे असेल. भारत 2021 मध्ये होणाऱ्या ब्रिक्स देशांच्या 13 व्या शिखर संमेलनाचे आयोजन करेल. यापूर्वी भारताने 2012 आणि 2016 मध्ये ब्रिक्स देशांच्या शिखर संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले होते
ब्रिक्स देशांचे हे संमेलन अशावेळी आयोजित झाले, जेव्हा यातील दोन प्रमुख देश, भारत आणि चीनमध्ये पूर्व लडाखवरुन तणाव सुरू आहे. परंतू, आता दोन्ही देशांनी आपले सैनिक परत घेण्याचा प्रस्ताव मांडला आहे.