धामोरीत तणाव ; दोन दिवस गाव बंद

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

तालुक्यातील धामोरी येथे शनिवारी सकाळी गावातील प्रवेशद्वाराजवळ असलेल्या सार्वजनिक मुतारीतील

आतील बाजूच्या भिंतीवर अज्ञात समाज कंटकाने काळ्या रंगाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत आक्षेपार्ह लिखाण करून अवमान केला. त्यामुळे गावात असंतोष पसरला असून गावाने संपूर्ण धामोरी गाव दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. गावातील परिस्थिती तणावपूर्ण असून पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.

हा प्रकार सकाळी काही जागरुक ग्रामस्थांच्या निदर्शनास आला. या घटनेनंतर थोड्याच वेळात भीमसैनिकांचा जमाव घटनास्थळी जमून तणाव निर्माण झाला. या घटनेचे वृत्त समजताच कोपरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. कोपरगाव पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला.

याप्रसंगी तणावपूर्ण वातावरणात पोलिसांनी ग्रामस्थ व भीमसैनिक यांच्यासमवेत चर्चा केली. दोन दिवसांत या घटनेचा तपास करून आरोपीस अटक करण्याचे आश्वासन दिले. यावेळी या घटनेच्या निषेधार्थ धामोरी ग्रामस्थांनी दोन दिवस गाव बंद पाळण्याचे घोषित केले.

यावेळी लोकजन शक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष विलास आहिरे, आर .पी आय.चे तालुकाअध्यक्ष जितेंद्र रणशुर, दिनेश कांबळे, कोपरगाव पोलीस निरीक्षक कटके, धामोरी पोलीस पाटील संगीता ताजणे, सरपंच बंडु भाकरे आदींनी मनोगत व्यक्त केले.

याबाबत अविनाथ बाळासाहेब आहिरे, रा. धामोरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध भा.दं.वि.कलम 295 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कटके करत आहेत.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *