Friday, April 26, 2024
Homeनगरसंचमान्यतेनंतरच शिक्षक भरती

संचमान्यतेनंतरच शिक्षक भरती

अहमदनगर |प्रतिनिधी| Sangamner

2022-23 या शैक्षणिक वर्षाची संच मान्यता झाल्यावर त्यातून रिक्त व अतिरिक्त शिक्षकांची संख्या समोर येणार आहे. त्यानंतर नवीन शिक्षकांची भरती प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पण, सध्या 2021-22 या वर्षाचीच संच मान्यता सुरू आहे. त्यामुळे 2022-23 या वर्षातील संच मान्यतेसाठी आणखी काही दिवसांची वाट पाहावी लागणार आहे.

- Advertisement -

दरम्यान, राज्यातील शाळांनी अद्याप साडेतीन लाख विद्यार्थ्यांची आधार माहिती स्टुडंट्स (विद्यार्थी प्रणाली) पोर्टलवर नोंदवलेली नाही. त्यामुळे ते विद्यार्थी बोगस असल्याचे गृहीत धरून संच मान्यतेत जवळपास 13 हजार शिक्षक अतिरिक्त ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 30 एप्रिलची मुदत संपल्यानंतर अनेकांची चिंता वाढली आहे, पण त्या कामासाठी आता अंदाजे 30 जूनपर्यंत मुदतवाढ राहील, अशी माहिती पुढे आली आहे.

जिल्हा परिषदेसह खासगी अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांचे आधार असणे बंधनकारक आहे. नाव, लिंग, जात, अशा चुकांची दुरुस्ती देखील करणे आवश्यक असल्याचे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. आता आगामी संच मान्यतेसाठी आधार क्रमांक व अचूक माहिती असलेलेच विद्यार्थी ग्राह्य धरले जाणार आहेत. त्यासाठी शालेय शिक्षण विभागाने शाळांना 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली होती.

तत्पूर्वी, 15 एप्रिलपर्यंत मुदत होती. मात्र, संकेतस्थळाच्या सर्व्हरला नेटवर्कचे अडथळे आणि स्लो मोडमुळे अनेकांना वेळेत काम करता आले नाही. त्यातच आता शाळांना सुटी लागली आहे. सुट्ट्यांमुळे विद्यार्थी देखील परगावी आहेत. या पार्श्वभूमीवर 15-20 दिवसांची मुदतवाढ देऊनही काम होणे अशक्य आहे. त्यामुळे शाळा सुरू झाल्यावरच उर्वरित काम करावे लागणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या