नाशिक | Nashik
गेल्या वर्षी ०३ जून रोजी मुंबई व महाराष्ट्राच्या पश्चिमी किनारपट्टीवर निसर्ग चक्रिवादळाने धडक मारली होती.
आता या वर्षी सुमारे पंधरा ते सतरा दिवस आधीच तौकटे चक्रिवादळ केरळ किनारपट्टीवर धडक मारण्याची शक्यता आहे. आज (दि. १२) मे रोजी दुपारी दोन वाजता इन्सॅट या उपग्रहानी पाठवलेल्या छायाचित्रा नुसार जवळपास संपूर्ण अरबी समुद्रावर चक्रिय कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झालेले आहे व याचा केंद्र हे केरळच्या पश्चिम समुद्रात आहे.
उद्या दिनांक १३ मे पासून याचे चक्रवातात रुपांतर होण्यास सुरुवात होईल व अंदाजे १५ मे रोजी याचे तौकटे चक्रिवादळात रुपांतर होईल व केरळच्या पश्चिम किनारपट्टीवर सर्व प्रथम धडकेल. यावेळी त्याचा वेग ताशी पन्नास किमी च्या जवळ असेल. सध्या असलेली त्याची व्याप्ती, दाब, वेग व दिशा पहाता हे चक्रिवादळ लगेच शमेल असे दिसत नाही. (दि. १६ मे पर्यंत संपूर्ण केरळ , लक्षद्विप व मालदीव बेटांच्या किनारपट्टीवर बरसल्यावर त्याची दिशा उत्तर दिशेला कोकण किनारपट्टी कडे सरकेल. येथून पुढील ७२ तासात म्हणजे (दि. १८) मे पर्यंत कर्नाटक, गोवा व महाराष्ट्र या राज्यांच्या पश्चिमी कोकण किनारपट्टीवरुन मुंबई कडे सरकण्याची शक्यता आहे.
(दि. १९) पासून याचा मुंबई कडे आल्यावर व मुंबई वर बरसल्यावर याचा मार्ग पश्चिम दिशेला सरकत गुजरात ला वळसा घालून २२ मे रोजी पाकिस्तान च्या दक्षिण किनारपट्टीवर कराचीला धडकणार आहे.
एकुणच गेल्या वर्षी पेक्षा यावर्षी अरबी समुद्रात वेळेच्या आधी चक्रिवादळाने हजेरी लावली आहे. या निर्माण होत असलेल्या चक्रिवादळाचे तौकटे असे नामकरण असणार आहे. हे नाव म्यानमार या देशाने सुचवलेले आहे.
– श्रीनिवास औंधकर, संचालक, एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्र औरंगाबाद.