टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan
टाकळीभान येथील गणेशखिंड रस्त्यावरील पाटाच्या पुलावर गेल्या कित्येक दिवसांपासून भगदाड पडले असून त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाल्याने अपघात होण्याची शक्यता बळावली आहे, या दुर्लक्षामुळे टाकळीभान, खिर्डी, गणेशखिंड परिसरातील नागरिकांसह आज ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा पंचायत समितीच्या माजी सभापती डॉ. वंदनाताई मुरकुटे यांनी दिला आहे.
तहसीलदार प्रशांत पाटील यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, टाकळीभान, गणेशखिंड, पाचेगाव, खिर्डी, वांगी, भेर्डापूर व पुढे राहुरी तालुक्याला जोडणारा हा रस्ता आहे, तसेच या रोडवरील गणेशखिंड येथे भाविक भक्तांची दर्शनासाठी नेहमीच गर्दी व वर्दळ असते. महत्त्वाचा असलेल्या या रस्त्याच्या पाटाच्या पुलावर मोठे भगदाड पडले आहे. त्यामुळे प्रवासासाठी हा रस्ता धोकादायक बनला आहे. पुलावर पडलेल्या भगदाडामुळे वाहतूकदार, प्रवासी यांची मोठी अडचण होऊन या रोडवर अपघात होण्याची शक्यता आहे.
पाटबंधारे विभाग तसेच सार्वजनिक बांधकाम विभागास या भगदाडाचे काम व्हावे, यासाठी वारंवार विनंती केली आहे. परंतु या विभागाने पुलाच्या कामाकडे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. त्या निषेधार्थ व पडलेल्या भगदाडाचे काम करण्याच्या मागणीसाठी परिसरातील नागरिक शेतकर्यांसह मंगळवार दि. 26 जुलै रोजी सकाळी 10 वा. या भगदाडासमोर रस्त्यावर ठिया आंदोलन करणार असल्याचे माजी सभापती डॉ. वंदनाताई मुरकुटे यांनी निवेदनात म्हटले आहे.