Thursday, April 25, 2024
Homeनगरटाकळी बंधारा फुटून शेतात घुसले पाणी

टाकळी बंधारा फुटून शेतात घुसले पाणी

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

तालुक्यातील टाकळी येथे बंधार्‍याचा भराव फुटून या बंधार्‍यातील पाणी लगतच्या शेतात जाऊन पिकांचे नुकसान झाले आहे.

- Advertisement -

झालेल्या घटनेची माहिती मिळताच आ. आशुतोष काळे यांनी पाहणी करून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव यांना दिल्या आहेत.

शुक्रवारी रात्रीच्या सुमारास टाकळी येथील दगडी साठवण बंधारा फुटल्यामुळे बंधार्‍यालगत असलेल्या शेतात पाणी शिरून बाजरी, सोयाबीन, मका आदी पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान होऊन कांदा चाळीत पाणी शिरल्यामुळे कांद्याचे देखील नुकसान झाले आहे. चालू वर्षी जून महिन्यापासून पाऊस पडत आहे.

कोपरगाव तालुक्यात मागील काही दिवसांपासून सातत्याने पडत असलेल्या पावसामुळे शेतातील पिके पिवळी पडत असल्यामुळे शेतकर्‍यांच्या चिंता वाढल्या आहेत. अशा परिस्थितीतून शेतकरी जात असताना टाकळी साठवण बंधार्‍याचा भराव वाहून फुटल्यामुळे शेतीचे नुकसान झाले आहे.

बंधार्‍याचा भराव फुटल्याने या बंधार्‍यातील पाणी कमी करून होणारे नुकसान कमीत व्हावे यासाठी या बंधार्‍याचे लोखंडी गेट उघडण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र लोखंडी गेट उघडले गेले नाही. त्यामुळे नुकसानीची आकडेवारी वाढण्याची शक्यता आहे.

त्यामुळे झालेल्या नुकसानीचे बारकाईने पंचनामे करून मदतीसाठी प्रस्ताव तयार करावेत व भविष्यात या बंधार्‍यात पाणी साठले जावे यासाठी या बंधार्‍याची तातडीने दुरुस्ती करा अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी केल्या आहेत.

यावेळी सभापती सौ. पौर्णिमाताई जगधने, कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे संचालक विठ्ठलराव आसने, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव, उपअभियंता उत्तम पवार, भाऊसाहेब देवकर, छगनराव देवकर, धनंजय देवकर, शशिकांत देवकर, गणेश पळसकर, बाबासाहेब जगताप, बाळासाहेब देवकर, राजेंद्र देवकर, रामा गायकवाड, गोरख देवकर, सुरेश पाईक, हरिभाऊ देवकर, यशवंत देवकर आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या