नवी दिल्ली –
दिल्लीतील निजामुद्दिन परिसरात मार्चमध्ये झालेेल्या तबलिगी जमातच्या कार्यक्रमामुळे करोना विषाणूचा संसर्ग
अनेक लोकांपर्यंत पोहोचला, असे केंद्रिय गृहमंत्रालयाने सोमवारी राज्यसभेमध्ये सांगितले. केंद्रीय गृहराज्यमंत्री जी किशन रेड्डी यांनी लेखी उत्तराच्या माध्यमातून राज्यसभेमध्ये ही माहिती दिली.
त्यांनी सांगितले, दिल्ली पोलिसांनी तबलिगी जमातच्या 233 सदस्यांना अटक केली आहे. तसेच 29 मार्च रोजी संघटनेच्या मुख्यालयामधून 2 हजार 361 जणांना बाहेर काढण्यात आले. मात्र तबलिगी जमातचा प्रमुख मौलाना साद याच्याबाबतचा तपास सुरू आहे.
करोनाचा संसर्ग सरू झाल्यानंतर विविध प्राधिकरणांनी दिलेल्या सूचना आणि आदेशांकडे दूर्लक्ष करत दीर्घकाळ मास्क आणि सोशल डिस्टंसिंगची व्यवस्था न करता एका बंद परिसरात मोठी सभा झाली. त्यामुळे अनेक व्यक्तींना करोनाचा संसर्ग झाला.
दरम्यान, करोनाच्या साथीच्या प्रतिबंधासाठी लागू करण्यात आलेल्या देशव्यापी लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करण्याचे कारस्थान आणि मोठ्या रकमेची अफरातफर केल्याप्रकरणी मौलाना साद यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे. मौलाना साद आणि त्यांच्या सहकार्यांविरोधात जाणीवपूर्वक साथ पसरवल्याचा, संभाव्य सामूहिक हत्येचे प्रयत्नांसह अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मार्च महिन्यात दिल्लीतील निजामुद्दीन येथे झालेल्या तबलिगी जमातीच्या कार्यक्रमामध्ये देशविदेशातील किमान 9 हजार लोक सहभागी झाले होते. या लोकांमुळेच दिल्ली आणि आसपासच्या भागात करोना पसरल्याचा आरोप केला जात होता. त्यानंतर सरकार आणि प्रशासनाने मिळून तब्बल साडे पंचवीस हजार जमातींना शोधून शोधून क्वारंटाइन केले होते.