पाच दिवसांत चौघांचे निलंबन

jalgaon-digital
2 Min Read

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा परिषद प्रशासनाचा गाडा हाकताना प्रशासनात काम करणार्‍या कर्मचार्‍यांकडून होणार्‍या चुका आणि बेशिस्तीवर मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी बोट ठेवत थेट निलंबनाची कारवाई केली आहे. यात ग्रामपंचायत विभागातील दोघा ग्रामसेवक आणि दोन पशूसंवर्धन विभागाच्या अधिकार्‍यांचा समावेश आहे.

पारनेर तालुक्यातील पुणेवाडी (हत्तीखिंड) येथील ग्रामसेवक संजय मते यांनी थेट गटविकास अधिकारी यांना दमदाटी आणि शिविगाळ केल्याचा ठपका ठेवत त्यांना सेवेतून निलंबीत करण्यात आले आहे. तसेच त्यांचे मुख्यालय हे पारनेरवरून शेवगाव करण्यात आले आहे. नेवासा तालुक्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी शेतकर्‍यांना आर्थिक मागणीची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. या प्रकरणात कविता शिंदे यांच्यावर ठपका ठेवत त्यांना सेवेतून निलंबीत करण्यात आले असून त्यांचे मुख्यालय नेवाशावरून थेट जामखेड करण्यात आलेले आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील वांगदरी गावातील पशूसंवर्धन विभागात कार्यरत असणारे पशूवैद्यकीय अधिकारी शांताराम आवारी यांच्यावर लम्पी निवारण कामात हालगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत त्यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांचे मुख्यालय हे श्रीगोंद्यावरून आता कोपरगाव करण्यात आले आहे. संगनमनेरच्या चंदनापुरी गावातील पशूवैद्यकीय अधिकारी एस.बी. निकाळे यांच्या कामात हालगर्जीपण आणि लम्पी निवारणाकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले असून त्यांचे मुख्यालय हे संगमनेरवरून थेट पाथर्डी करण्यात आलेले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ही कारवाई 28 ऑक्टोबर ते 1 नोव्हेेंबरदरम्यान केलेली आहे.

आरोग्य सेवक बडतर्फ

अकोले तालुक्यातील खिरवीरे प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवक पुरूष उत्तम माळी यांच्यावर गैरवर्तन आणि सतत गैरहजर राहत असल्याने शिस्तभंगाची कारवाई करून विभागीय चौकशी सुरू करण्यात आली होती. या विभागीय चौकशीत माळी यांच्यावरील दोष सिध्द झालेले असल्याने त्यांना सेवेतून बडतर्फ करण्याचे आदेश जिल्हा परिषद प्रशासनाने दिले आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *