देवळाली प्रवरा |वार्ताहर|Devalali Pravara
आंबेडकर चळवळीतील कोणत्याही गटा-तटाच्या कार्यकर्त्यांवर दाखल केलेले खोटे गुन्हे कदापिही खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा राहुरीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.
आरपीआयच्यावतीने पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण हे गेल्या 30 ते 35 वर्षांपासून आंबेडकरी चळवळीत सक्रिय सहभागी आहेत. त्यांनी नेहमीच अन्याय अत्याचाराविरुद्ध सातत्याने आवाज उठवण्याचे काम केले. त्यामुळे केवळ द्वेषापोटी त्यांचा आवाज दडपून टाकण्यासाठीच त्यांच्या विरुद्ध जाणीवपूर्वक खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत.
आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या आदेशानुसार आंबेडकरी चळवळीतील कोणत्याही गटातटाच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केलेले यापुढील काळात खपवून घेतले जाणार नाहीत. शेवगाव येथील पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी केवळ द्वेष भावनेतून आकसापोटी खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत. ते त्यांनी तात्काळ मागे घ्यावेत, अशी आमची प्रमुख मागणी असून ती मान्य न झाल्यास आमचे कार्यकर्ते आरपीआयच्यावतीने जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून तहसील कचेरी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून शेवटी जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयावरही भव्य मोर्चा काढला जाईल, याची संपूर्ण जबाबदारी संबंधित अधिकार्याची राहील याची नोंद घ्यावी, असे निवेदनात म्हटले आहे.
हे निवेदन देताना जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, सिद्धांत सगळगिळे, तालुका उपाध्यक्ष सुनील चांदणे, महिला आघाडी तालुका अध्यक्ष स्नेहल सांगळे, मयूर कदम, माऊली भागवत, मुस्लिम आघाडी जिल्हाध्यक्ष आयुबभाई पठाण, बाळासाहेब पडागळे, दादू साळवे, किरण साळवे, नवीन साळवे, राजू दाभाडे, रवींद्र शिरसाठ, सूरज साळवे, भाऊसाहेब साळवे, भूषण साळवे आदी कार्यकर्ते उपस्थित होते