मुंबई । प्रतिनिधी Mumbai
निम्मा जून महिना उलटला तरी राज्यात पावसाची चिन्हे दिसत नसल्याने प्रशासनाच्या तोंडचे पाणी पळाले आहे. अशातच कडक उन्हामुळे धरणांतील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असून टंचाईग्रस्त भागातील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची तहान भागवण्यासाठी आजच्या घडीला 450हून अधिक टँकर्सद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.
गेल्यावर्षी याच दिवशी राज्यातील सुमारे तीन हजार धरणांमध्ये 30.56 टक्के पाणीसाठा होता. पण यावर्षी हा पाणीसाठा 23.28 टक्क्यांवर आला आहे. राज्याच्या महसूल विभागानुसार नाशिक विभागात 24.28 टक्के, कोकण विभागात 31.02 टक्के, नागपूरमध्ये 37.43 टक्के तर पुणे विभागात सर्वाधिक कमी म्हणजे 11.95 टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणार्या वैतरणा धरणात 18.53 टक्के, मध्य वैतरणामध्ये 11.49 टक्के, भातसात 26.66 टक्के, मोडक सागरमध्ये 44.71 टक्के तर तानसा धरणात 31.23 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
पावसाळा लांबल्याने अनेक जिल्ह्यांत आता टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. अनेक गावांमध्ये महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून टँकरचे प्रस्ताव वाढू लागले आहेत, अशी माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी मंगळवारी दिली. दरम्यान, राज्याला मान्सूनपूर्व पावसानेही हुलकावणी दिल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. जूनमध्ये आतापर्यंत सरासरी फक्त 19 मि.मी. पावसची नोंद झाल्याची माहिती कृषी विभागातील अधिकार्यांनी दिली.
जिल्हानिहाय टँकर्स
नाशिक-57, अहमदनगर-32, ठाणे-48, रायगड-47, रत्नागिरी-20, पालघर-39, पुणे-39, सातारा-38 आणि जालना-40