नेवासा | सुखदेव फुलारी| Newasa
राज्यातील करोना रुग्णांसाठी ऑक्सिजन कमी पडू नये यासाठी सर्व जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी त्या त्या जिल्ह्यात
ऑक्सिजन सिलेंडर तयार करणार्या कारखान्याने उत्पादित केलेले सर्व 100 टक्के सिलेंडर करोनासाठी राखीव केल्याने राज्यातील साखर कारखाने व इतर उद्योगांना सध्या वेल्डिंग व फॅब्रिकेशनची कामे करण्यासाठी ऑक्सिजन सिलेंडरची टंचाई भासत असल्याने उद्योग संकटात आले आहेत.
राज्यातील सर्व जिल्ह्यांतील कोव्हिड-19 बाधित रुग्णांना वैद्यकीय सेवा पुरविणे करिता ऑक्सिजन सिलेंडरची निकड लक्षात घेता, सर्व खाजगी ऑक्सिजन पुरवठादार व्यावसायिकांना ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा हा फक्त कोव्हिड -19 रुग्णांसाठी (सर्जिकल कारणासाठी) आवश्यक असणार्या सर्व शासकीय आणि खाजगी हॉस्पिटल यांना राखीव ठेवणे बंधनकारक असल्याचे आदेश सर्व जिल्हाधिकारी यांनी दिलेले आहेत.
त्यामुळे ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध होत असल्याने साखर कारखाने व इतर उद्योगांत सुरू असलेले कटींग, वेल्डिंग व फॅब्रिकेशनची कामे ठप्प झालेली आहेत.
लोखंडी कामांची जोडणी व उभारणीत वेल्डिंग करतांना ऑक्सिजन हा खूप म्हत्वाचा घटक आहे.परंतु ऑक्सिजनच मिळत नसल्याने कटींग-वेल्डिंगवर आधारित सर्व कामे ठप्प झालेली आहे. याचा परिणाम साखर उद्योगातील कामावरही झालेला आहे.
याबाबद वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोशिएशनने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना महाराष्ट्र राज्यातील साखर कारखान्यांना ऑक्सिजन सिलेंडरचा वापर व सुलभ पुरवठा करणे बाबद पत्र लिहिले आहे.
पत्रात वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोशिएशनने म्हंटले आहे की, राज्यामध्ये चालू हंगामामध्ये साखरेचे उत्पादन 105 लाख टनापर्यंत होणेचे अनुमान दिसून येते. या पार्श्वभुमीवर व आपल्या अध्यतेखालील दिनांक 25 जून 2020 मंत्री समितीच्या सभेच्या निर्णयानुसार यंदाचा 2020-21 चा साखर हंगाम दि .15 ऑक्टोबरपासून चालू होत आहे.
राज्यातील कोविड 19 बाधित रुग्णांना वैद्यकिय सेवा पुरविणेसाठी ऑक्सिजन सिलेंडरची निकड लक्षात घेता, सर्व खाजगी ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठादार व्यवसायिकांना ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा हा फक्त कोविड -19 रुग्णांसाठी आवश्यक असणार्या सर्व शासकीय व खाजगी हॉस्पीटल यांना राखीव ठेवावेत असे आदेश कांही जिल्ह्याधिकार्यांनी निर्गमित केले आहेत असे समजते.
राज्यातील सन 2020-21 चा ऊस गळीत हंगाम दि. 15 ऑक्टोबर पासून सुरु होणार आहे. यावर्षी ऊसाची उपलब्धता मुबलक प्रमाणात असून ऊसाची उपलब्धता पाहता सदरचा हंगाम मे 2021 पर्यंत सुरु राहण्याची शक्यता आहे. साखर कारखान्यांना गळीत हंगाम सुरु करण्यापुर्वी कारखान्याच्या दुरुस्तीचे व हंगामासाठी आवश्यक इतर तांत्रिक कामकाज पुर्ण करणे आवश्यक आहे.
कारखान्यांनी कळविल्याप्रमाणे बिगर हंगाम देखभाल व दुरुस्तीच्या कामकाजाकरीता त्यांना 8 किलोच्या प्रती दिन 20 ऑक्सिजन सिलेंडरची आवश्यकता लागणार असून, गळीत हंगाम सुरु झाल्यानंतर हंगामामध्ये 8 किलोच्या प्रती दिन 10 ऑक्सिजन सिलेंडरची आवश्यकता आहे .
साखरेचा समावेश जीवनावश्यक वस्तूमध्ये केला असून गळीत हंगामाच्या पूर्व तयारीसाठी व गळीत हंगाम सुरु झाल्यानंतर ऑक्सिजनचा पुरवठा कारखान्यांना होणे गरजेचे आहे. त्यामुळे येता गळीत हंगाम सुरळीत पार पाडणे कारखान्यांना शक्य होईल व शेतकरी सभासदांचा ऊस वेळेत गाळप करणे शक्य होईल.
वरील अत्यावश्यक बाबींसाठी महाराष्ट्र राज्यातील सर्व साखर कारखान्यांना आवश्यकतेनुसार ऑक्सिजन सिलेंडरचा सुलभ पुरवठयाकरीता कृपया शासन स्तरावर योग्य ते आदेश निर्गमित व्हावेत.