घारगाव |वार्ताहर| Ghargav
जुन्नर तालुक्यातील बोरी बुद्रुक गावातील वाणी मळ्यात शॉर्टसर्कीट होऊन 45 एकर ऊस जळाल्याने 90 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना रविवार (28 नोव्हेंबर) रोजी घडली.
बोरी बुद्रुक (ता.जुन्नर) येथील वाणीमळ्यातील दिनकर काळे, सुभाष काळे, निवृत्ती काळे, शिवाजी काळे, शिवाजी बेल्हेकर, ज्ञानेश्वर चिंचवडे, रोहन बेल्हेकर, अशोक काळे, सुदाम काळे, इंदुबाई जाधव, जयराम काळे, दत्तात्रय काळे, विठ्ठल काळे, अभय चोरडिया, राजेंद्र चोरडिया, वसंत काळे, रमेश काळे, या 18 शेतकर्यांचे एकूण 45 एकर क्षेत्र असून या क्षेत्रातून गेलेली महावितरणची विद्युत तारेचा शॉर्टसर्किट होऊन उसाने पेट घेतला. यातील काही उसाची तोड चालू होती तर काही ऊस थोड्याच दिवसांत कारखान्याला गाळपासाठी जाणार असल्याचे शेतकर्यांनी सांगितले.
विघ्नहर कारखाना, भीमाशंकर कारखाना व पराग शुगर यांनी संबंधित ऊस लवकर गाळपासाठी नेला जाईल. या उसाचे पंचनामे करण्यात आले असून महावितरणाच्या गलथान कारभारामुळे हे नुकसान झाल्याचे शेतकर्यांच्या म्हणणे आहे. दरम्यान जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील आळेफाटा परीसरातील आळे, राजुरी, बोरी बुद्रुक, साळवाडी, जाधववाडी या गावांमध्ये गेल्या एका महिन्यात मोठ्या प्रमाणावर विजेच्या शॉर्टसर्कीटने ऊस जळाला असून या शेतकर्यांना त्यांची भरपाई मिळालेली नसून महावितरण कंपनीकडून भरपाई मिळावी अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे.