अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
पाचवी ते आठवी पर्यंतच्या शाळा सुरू झाल्या आहे. करोनाचा प्रभाव वाढत आहे. शाळेत येणार्या सर्व शिक्षकांचे लसीकरण करण्याबाबतचा ठराव
बुधवारी झालेल्या शिक्षण समितीच्या सभेत करून तो राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. तसेच ज्या शाळेत करोना विद्यार्थी सापडतील त्या ठिकाणचा आढावा घेऊन शाळा तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. दरम्यान शाळा सुरू झाल्यातरी विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित राहिले आहे. याला जिल्हा परीषदेचे अधिकारी जबाबदार असून या अधिकार्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिक्षण समितीचे सदस्य राजेश परजणे, जालिंदर वाकचौरे यांनी केली.
बुधवारी दुपारी एक वाजता जिल्हा परीषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण समितीचे सभापती प्रतापराव शेळके यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परीषद शिक्षण समितीची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी समितीचे सदस्य राजेश परजणे, जालिंदर वाकचौरे, सचिव तथा शिक्षणाधिकारी शिवाजी शिंदे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) रामदास हराळ यांच्यासह सर्व गटशिक्षणाधिकारी, बांधकाम विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
सर्व गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख यांच्या शैक्षणिक गुणवत्ता व दर्जात्मक वाढीबाबत बैठकांचे आयोजन करावे असा निर्णय घेण्यात आला. शाळाबाह्य अनियमित व स्थलांतरित बालकांना शाळेच्या मुख्य प्रवाहात दाखल करणेकामी सुक्ष्म नियोजन करून फेर सर्व्हेक्षण करण्याच्या सुचना संबंधितांना देण्यात आल्या. शिष्यवृत्ती परीक्षा जास्तीत जास्त सराव घ्याव्यात व सर्व स्तरावरिल उदिष्ट निश्चित करून ऑनलाईन स्तरावर घेण्याचे ठरले.