श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
बेलापूर ग्रामपंचायतीचे भंगार सामान चोरीस गेल्यानंतर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
त्यानंतर दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी तपास केला असता सदरचे सामान ग्रामपंचायतीच्या वरच्या खोलीत आढळून आले. त्यामुळे सदरची फिर्याद मागे घेतली.
भंगार चोरीला गेल्याची फिर्याद ग्रामविकास अधिकारी राजेंद्र तगरे यांनी दाखल केली होती, त्यानुसार पोलिसांनी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतलेही मात्र अधिक चौकशी केली असता सामान ग्रामपंचायतीच्या वरच्या खोलीत आढळल्याने बुधवारी ग्रामविकास अधिकार्यांनी तक्रार मागे घेतली आहे.
सामान चोरी प्रकरणी ग्रामविकास अधिकारी राजेंद्र तगरे यांनी 9 डिसेंबर रोजी बेलापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती व यात म्हटले होते,आपण व प्रशासक श्रीरंग गडधे हे येथे स्वच्छता पाहण्यासाठी गेलो असता कर्मचार्यांनी सुभाषवाडी तळ्यावरील विजेचे खराब झालेले कंडक्टर आणून येथील स्टोअर रुममध्ये ठेवलेले होते.
मात्र ते आता गायब झाले आहे.त्यावरून ग्रामविकास अधिकारी तगरे यांनी फिर्याद दिली असून 19 हजार 200 रुपयांचे कंडक्टर व 10 हजार रुपयांचे इतर भंगार असे 29 हजार 200 रुपयांचे सामान चोरीला गेल्याचे म्हटले होते. याबाबत बेलापूर पोलिसांनी मंगळवारी दोन कर्मचार्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.त्यांचेकडे अधिक चौकशी केली असता सदरचे सामान ग्रामपंचायतीच्या वरच्या खोलीत आढळून आले.
आमच्यावर खोटे आरोप केले गेले अशी संतप्त प्रतिक्रिया देत बुधवारी सकाळी ग्रामपंचायत कर्मचार्यांनी अचानक काम बंद आंदोलन सुरू केले होते.त्यामुळे सकाळी होणारा पाणीपुरवठाही बंद ठेवण्यात आला होता. मात्र त्यानंतर काही सामाजिक कार्यकर्त्यांनी मध्यस्थी करून कर्मचार्यांची समजूत काढली. त्यानंतर कर्मचार्यांनी आंदोलन मागे घेतले. त्यानंतर पाणी पुरवठा सुरळीत झाला. या घडामोडीनंतर ग्रामविकास अधिकारी राजेंद्र तगरे यांनी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार मागे घेत असल्याबाबत जबाब दिला.