Thursday, April 25, 2024
Homeनगरअहिल्यादेवी होळकरांचा पुतळा अडकला जागेच्या वादात

अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा अडकला जागेच्या वादात

पुतळ्याचे श्रेय आदिकांना जाऊ नये म्हणून स्वतंत्र जागेची मागणी; राजेंद्र पानसरे व अर्चना पानसरे यांचा आरोप

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

- Advertisement -

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Punyashlok Ahilya Devi Holkar) यांचा पुतळा बसवला (statue was installed) तर धनगर आरक्षण कृती समिती (Dhangar Reservation Action Committee) व पुतळा समिती आणि नगराध्यक्षा अनुराधा आदिक (Mayor Anuradha Adik) यांच्यासह विद्यमान नगरसेवकांना त्याचे श्रेय मिळेल या भितीने मुरकुटे (Murkute) व त्यांचे हस्तक स्वतंत्र जागेत पुतळा बसविण्याची श्रेयवादापायी मागणी करीत असल्याचे समितीचे अध्यक्ष राजेंद्र पानसरे (Rajendra Pansare) व माजी नगरसेविका अर्चना पानसरे यांनी म्हटले आहे.

पानसरे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, समाजातील सर्व धनगर बांधवांनी एकत्रितपणे येऊन अहिल्यादेवी यांचा पुतळा बसविण्याची नगरपरिषदेकडे मागणी केली होती. त्यानुसार दि. 31 ऑगस्टला नगरपालिका सर्वसाधारण सभेत मंजुरी देऊन नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष व नगरसेवकांनी धनगर समाजाच्या भावना लक्षात घेऊन पुतळा बसविण्यास परवानगी दिली आहे. अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा सन 2009 मध्ये दोन्ही महापुरुषांच्या मध्यभागी बसविण्याचा स्व. जयंतराव ससाणे यांनी निर्णय घेतला होता. परंतु, त्यांना श्रेय मिळू नये यासाठी त्यावेळीही मुरकुटे यांनी हस्तकांमार्फत विरोध दर्शविला होता. त्यामुळे आतापर्यंत त्या ठिकाणी पुतळा बसविण्यात आलेला नाही.

राज्यात कोठेही महापुरुषांचा पुतळा बसविण्यास स्वतंत्र जागेत शासन स्तरावर परवानगी मिळत नाही. त्याकरिता कडक निर्बंध असून याबाबत मुरकुटे यांनाही माहिती आहे. मुरकुटे यांच्या हस्तकांचा वेगळ्या जागेत पुतळा बसविण्याची मागणी म्हणजे पुतळा बसवला जाऊ नये यासाठी असल्याचे यावरून दिसत असल्याचे पानसरे यांनी म्हटले आहे.

तालुक्यातील धनगर समाज बांधवांनी यासंदर्भात विचार करण्याची गरज असून समाजातील काही मंडळी राजकारण्यांच्या श्रेयवादापायी अहिल्यादेवी यांच्या पुतळ्यास अडथळा आणीत आहेत. मुरकुटे नेहमीप्रमाणे हस्तकांमार्फत विरोध दर्शवून समाजात दुही निर्माण करीत असल्याचे पानसरे यांनी म्हटले आहे. अहिल्यादेवी होळकरया धनगर समाजाच्या नव्हे तर सर्वच समाजाचे श्रद्धास्थान असून काही मंडळी विरोध करीत असून तो सर्वांनी एकत्रितपणे हाणून पाडावा. कारण नगरपालिकने केलेल्या ठरावाच्या जागेतच पुतळा बसविला जाऊ शकतो. इतर ठिकाणी परवानगी मिळणे शक्यच नसल्याने आहे त्या जागेत लवकरात लवकर पुतळा बसविण्यासाठी समाजबांधवांनी साथ द्यावी, असेही आवाहन पानसरे यांनी केले आहे.

या पत्रकावर मार्केट कमिटीचे संचालक भाऊसाहेब कांदळकर, भारत सोनवणे, नितीन राशिनकर, रासपचे सुनील चिंधे, विठ्ठल करडे, सुधीर धालपे, विलास गोराणे, राजू कांदळकर बाळासाहेब वारे, सचिन लाटे, राजेंद्र ढवण, दत्तू करडे, रासपचे नंदू खेमनर, दत्तात्रय कचरे, गणेश राशिनकर, दादासाहेब लाटे आदींची नावे आहेत.

पुतळा चुकीच्या ठिकाणी बसवून श्रेय घेऊ नये; धनगर समाज संघर्ष समिती व अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठानचा इशारा

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

धनगर समाज कुणा राजकीय नेत्याचा हस्तक नसून प्रत्येक सामाजिक व राजकीय नेत्याला वेळोवेळी सहकार्य केलेले आहे. त्यामुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा पुतळा चुकीच्या ठिकाणी बसवून उगाचच श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये असा इशारा धनगर समाज संघर्ष समिती व अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान श्रीरामपूर यांनी दिला आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा बसविण्यासाठी सन 2009 मध्ये श्रीरामपूर नगर पालिकेने निर्णय केला होता. तेव्हाही आम्ही दोन महापुरुषांच्या मध्ये अहिल्यादेवींचा पुतळा न बसवता स्वतंत्र जागेत बसवावा ही मागणी केली आहे व तो संघर्ष 15 वर्षापासून आजपर्यंत चालू आहे. दि. 28 एपिल 2018 रोजी धनगर समाजाच्यावतीने स्वतंत्र पुतळा बसवा या मागणीसाठी श्रीरामपूर नगरपालिका येथे आंदोलन करण्यात आले.

नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांचेकडे स्वतंत्र पुतळा बसविण्याची आग्रही मागणी धनगर समाज संघर्ष समिती व सखल धनगर समाज बांधवांच्यावतीने करण्यात आली व ही मागणी मान्य करून नगराध्यक्षा यांनी अहिल्यादेवींचा पुतळा दोन महापुरुषांच्यामध्ये न बसविता स्वतंत्र जागेत बसवू असे जाहीर केले व पुतळ्याच्या देखभालीसाठी रजिस्टर्ड संस्था असावी म्हणून विठ्ठलराव राऊत यांचे अध्यक्षतेखाली धर्मादाय आयुक्त अहमदनगर यांचेकडे अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान श्रीरामपूरची नोंदणी करण्यात आली.

15 वर्षापासून स्वतंत्र पुतळ्याची मागणी समाज वेळोवेळी करत असल्याने श्रीरामपूर नगरपालिका यांचे मिटिंग मध्ये अहिल्यादेवींचा पुतळा बसविण्यासाठी खर्चास मंजुरी दिली, असे सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यामुळे पुन्हा दोन महापुरुषांमध्ये अहिल्यादेवींचा पुतळा न बसवता स्वतंत्र बसवावा, अशी मागणी समाजाच्या बैठकीत करण्यात आली. यात कुठलेही राजकारण नसून कोणीही पुतळ्याच्या मुद्यावर राजकारण करू नये.अशोक साखर कारखान्यावर अहिल्यादेवींचा पुतळा बसवावा हा मुद्दा येणार्‍या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन स्वतःची राजकीय पोळी भाजण्याकरिता करू नये. राजकीय आकस डोळ्यासमोर ठेऊन अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्याचा कोणी राजकीय हेतूने वापर करू नये.

आम्ही दोन महापुरुषांच्या मध्ये अहिल्यादेवींचा पुतळा कुठल्याही परिस्थितीत होऊ देणार नाही. अहिल्यादेवींच्या पुतळ्याच्या मुद्याचा उपयोग जर कोणी खोटे आरोप करून वैयक्तिक राजकीय मतभेद बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तर समाज खपून घेणार नाही, असा इशारा सकल धनगर समाज संघर्ष समिती व अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान श्रीरामपूर यांनी दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या