मुंबई । प्रतिनिधी
राष्ट्रवादी पाठोपाठ काँग्रेसने खरीप हंगामाच्या तोंडावर करण्यात आलेल्या खतांच्या दरवाढीवर आक्रमक पवित्रा घेतला आहे. खतांची दरवाढ दोन दिवसात मागे न घेतल्यास काँग्रेसच्यावतीने राज्यव्यापी घंटानाद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बुधवारी येथे दिला.
करोनाच्या संकटाने शेतकरी पुरता पिचला गेला आहे. त्याला आधार देण्याऐवजी खतांच्या किंमती भरमसाठ वाढवून त्यांच्यावर आणखी अन्याय केला आहे. तीन काळे कृषी कायदे आणून मोदी सरकारने शेतक-यांना बड्या उद्योगपतींचे गुलाम बनविण्याचा विडा उचलला आहे. रासायनिक खतांच्या किंमतीत केलेली दीडपट वाढ हे त्या दृष्टीनेच टाकलेले पाऊल आहे. दीडपट हमीभाव देण्याची घोषणा करणा-या मोदींनी हमीभावाऐवजी शेतक-यांना येणारा उत्पादन खर्च दीडपट वाढवला आहे,अशी टीका पटोले यांनी केली.
अशा वाढल्या खतांच्या किंमती
पेट्रोल-डिझेल, खाद्यतेलांच्या दरवाढीमुळे अगोदरच जनतेचे कंबरडे मोडले असताना रासायनिक खतांच्या दरवाढीचा बोजा शेतक-यांवर पडला आहे. १०.२६.२६ खताची किंमत ६०० रुपयांनी वाढली आहे तर डीएपीची किंमत ७१५ रूपयांनी, डिएफएच्या गोणीची किंमत आधी १ हजार १८५ रुपये होती ती आता १ हजार ९०० रुपये केली आहे. १०.२६.२६ च्या ५० किलोच्या पोत्याला १ हजार १७५ रुपयांऐवजी १ हजार ७७५ रुपये मोजावे लागणार आहे. तसेच पोटॅशच्या किंमतीही वाढवल्या आहेत, अशी माहिती पटोले यांनी दिली.
एका बाजूला शेतकऱ्यांच्या खात्यात २ हजार रुपये जमा केल्याचा गाजावाजा करून दुस-या बाजूला खतांच्या किंमती वाढवून प्रत्यक्षात शेतक-यांची लूट करत पंतप्रधान नरेंद्र हे उद्योगपती मित्रांची घरे भरण्याचे काम करत आहेत, असा आरोप नाना पटोले यांनी केला.