अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
राज्य सरकारमध्ये विलिनीकरण व्हावे, यासाठी दीड महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून राज्यातील एसटी कर्मचार्यांचा संप सुरू आहे. या संपात नगर जिल्ह्यातील कर्मचारी सहभागी झाले होते. मात्र, मंगळवारपर्यंत (दि.28) जिल्ह्यातील 1 हजार 143 कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. तर श्रीरामपुरातील एका कर्मचार्याला बडतर्फ का करण्यात येऊ नये, अशी नोटीस बजावण्यात आली आहे.
जिल्हा विभागातील सुत्रांच्या माहितीनुसार जिल्ह्यात आतापर्यंत 1 हजार 143 प्रशासकीय, यांत्रिकीकरण विभाग आणि चालक-वाहक हे कामावर हजर झालेले आहेत. यात नगर मुख्यालय, तारकपूर, नेवासा, शेवगाव आणि कोपरगाव डेपोतील कर्मचार्यांचा समावेश आहे. मागील आवठड्यात जिल्ह्यातील विविध मार्गावरून 110 एसटीच्या बसेस धावत होत्या. त्यात वाढ होवून आता 115 एसटी बसेस जिल्ह्यात धावत आहे. यामुळे काही मार्गावर प्रवाशांना दिलासा मिळतांना दिसत आहेत. दरम्यान, श्रीरामपूर आगातील यांत्रिकरण विभागालातील एका कर्मचार्याला एसटी महामंडळाकडून बडतर्फीची नोटीस बजावण्यात आली असून संबंधीत कर्मचारी हा यांत्रिक विभागातील आहे.
कॉलेज विद्यार्थ्यांचे हाल
जिल्ह्यातील बहुतांशी ज्युनिअर आणि सीनीअर कॉलेज सुरू झालेले आहेत. या ठिकाणी दररोज विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांना उपस्थित राहण्याची सक्ती करण्यात आली आहे. खेडे गावातून शहराच्या ठिकाणी अथवा तालुक्याच्या ठिकाणी विद्यार्थ्यांना जाण्यासाठी खासगी वाहतूकीचा आधार घ्यावा लागत आहे. तर काही ठिकाणी एका दुचाकीवर तिघांना जीव घेणार प्रवास करावा लागत आहे.