Friday, April 26, 2024
Homeनगर2 लाख हेक्टरवर पेरणी

2 लाख हेक्टरवर पेरणी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्यात यंदा मान्सून चांगला होईल अशा अंदाज व्यक्त होत आहे. हवामान विभागाने देखील यंदा देशात चांगला पाऊस होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्या पार्श्वभूमीवर शेतकर्‍यांनी खरीपाच्या पेरणीची तयारी सुरु केली आहे. नगर जिल्ह्यात देखील अनेक ठिकाणी पेरणी लायक पाऊस झालेला असून आतापर्यंत 2 लाख 8 हजार हेक्टवर पेरणी पूर्ण झाली आहे. सर्वाधिक 61 हजार हेक्टरवर कपाशी तर 49 हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबिन पिकाची पेरणी झाली आहे.

- Advertisement -

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली असून ज्याठिकाणी चांगला पाऊस झालेला आहे, अशा ठिकाणी मशागती करून पेरण्या सुरु आहेत. जिल्ह्यात अनेक भागात अद्यापही मोठ्या पावसाची प्रतिक्षा आहे. ज्याठिकाणी पेरण्या झालेल्या आहेत, अशा ठिकाणी पिकांना पाण्याची गरज निर्माण झाली आहे. चालू महिन्यांत जिल्ह्यात सर्वदूर चांगला पावसाचा अंदाज असल्याने पेरण्यांना वेग येणार आहे.

यंदा सुरूवातीपासून चांगला पाऊस होणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज असल्याने ऐनवेळी अडचण नको म्हणून नगरच्या कृषी विभागाने खरीप हंगामाची जोरदार तयारी केलेली आहे. जिल्ह्यात खरिपाचे 4 लाख 47 हजार सरासरी क्षेत्र आहे. मात्र, अलिकडच्या काही वर्षात खरीप हंगामाचे क्षेत्र वाढताना दिसत आहे. गेल्या वर्षी देखील 5 लाख 31 हजारांहून अधिक क्षेत्रावर खरीप हंगामाच्या पिकांची पेरणी झाली होती.

यंदा देखील चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त होत असल्याने कृषी विभागाने येत्या खरीपासाठी 6 लाख 50 हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे. जिल्हा कृषी विभागानं खरीप हंगामासाठी 70 हजार 21 क्विंटल बियाण्यांची मागणी केली होती. प्रत्यक्षात आतापर्यंत 39 हजार 158 क्विंटल बियाणे उपलब्ध झाले असून यातील 20 हजार 504 क्विंटल बियाणांची विक्री देखील झाली असल्याची माहिती जिल्हा परिषद कृषी विभागाकडून देण्यात आली. दरम्यान दरवर्षी वातावरणातील होणार्‍या बदलानुसार पिकांच्या लागवड क्षेत्रात देखील बदल झाला असून त्यानुसार कृषी विभागाने नियोजन केल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

39 हजार हजार क्विंटल बियाणे उपलब्ध

जिल्ह्यात खरिपात तूर, मूग, उडीद, सोयाबीन, बाजरी यांच्या बियाणांची अधिक मागणी असते. जिल्ह्यात सध्या भात 4 हजार 102, ज्वारी 58, बाजरी 2 हजार 464, मका 2 हजार 106, तूर 923, मूग 746, उडिद 4 हजार 647, भूईमूग शुन्य, तीळ शुन्य, सुर्यफुल 20, सोयाबिन 22 हजार 465, कापूस 1 हजार 627 असे 39 हजार 158 क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे.

67 हजार 196 क्विंटल खतांची विक्री

जिल्ह्यात खरीप हंगामासाठी 2 लाख 75 हजार 505 क्विंटल रासायनिक खतांची मागणी करण्यात आली होती. यात सरकारकडून 2 लाख 25 हजार 500 क्विंटल रासायनिक खतांच्या आवंटनला मंजूरी दिली होती. तर जिलह्यात 63 हजार 535 क्विंटल खते शिल्लक होती. जिल्ह्यासाठी 63 हजार 216 क्विंटल खते उपलब्ध झाली असून मागील वर्षीचा साठा आणि उपलब्ध साठा असा जिल्ह्यात 1 लाख 29 हजार 781 क्विंटल खतांचा साठा उपलब्ध असून यातील 67 हजार 196 क्विंटल खतांची विक्री झालेली आहे.

काय…किती ?

हेक्टरनिहाय भात 84, ज्वारी 40, बाजारी 24 हजार 588, नागली 4, मका 8 हजार 60, तूर 15 हजार 128, मूग 23 हजार 682, उडिद 21 हजार 491, इतर खरीप कडधान्य 4 हजार 110, भूईमूग 13, तीळ 4, सुर्यफूल 110, सोयाबिन 49 हजार 27 आणि कापूस 61 हजार 96, चारा पिक 18 हजार 972 हेक्टर अशी पेरणी झालेली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या