अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
2020-21 खरीप हंगाम पीक कर्ज वाटपासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची मुदत आज (दि.15) होती. परंतु शेतकर्यांच्या मागणी व अडचणीचा विचार करून बँकेने पीक कर्ज वाटपाची मुदत महिनाअखेरपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती बैंकचे चेअरमन सिताराम पाटील गायकर व ज्येष्ठ संचालक माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी दिली.
जिल्ह्यात सर्वत्र पाऊस चांगला झाला असून शेतकर्यांची पीक कर्जासाठी जिल्हा बँकेकडे मोठ्या प्रमाणावर कर्ज मागणी होत आहे. बँकेने शेतकर्यांना विविध कार्यकारी सेवा सोसायटी मार्फत जनरल कर्ज मंजुरी पत्रक व पुरवणी कर्ज मागणीस मंजुरी देण्यात आलेल्या असून अद्याप अनेक शेतकरी सभासदांनी कर्ज उचल केली नसल्याने त्यांची पीक कर्जाची मागणी येत आहे.
जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर खरीप पिकाची तयारी करीत आहेत. पीककर्ज पुरवठा सुरळीत सुरू आहे. बँकेने खरीप हंगामासाठी पीक कर्ज वाटपास मुदतवाढ दिली आहे.
बँकेने 14 ऑगस्टपर्यंत 1 हजार 500 कोटीचे पिक कर्ज वाटप केले आहे. शासनाने दिलेले चालू खरीप हंगामासाठीचे उद्दिष्ट 1 हजार 498 कोटींचे उद्दिष्टपुर्ण केले असल्याची माहिती बँकेचे चेअरमन गायकर पाटील यांनी दिली.
शासनाने शेतकर्यांना पिक कर्ज वाटपासाठी मोठया प्रमाणावर मोहिम हाती घेतल्याने चालु हंगामात बँकेस खरीप कर्ज वाटप मोठया प्रमाणावर होणार असल्याचा अंदाज गायकर यांनी यांनी व्यक्त केला असून बँकेने त्यादृष्टीकोनातून सर्व आवश्यक बाबींची तयारी ठेवलेली आहे.