Thursday, April 25, 2024
Homeनगरगावाचे उज्ज्वल भविष्य जल आत्मनिर्भरतेवर अवलंबून

गावाचे उज्ज्वल भविष्य जल आत्मनिर्भरतेवर अवलंबून

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

गावातील जलस्त्रोतांचे गाळ निघाल्याने जलसंचय वाढेल व गाव पाणीदार होण्यास मदत होणार आहे. तर काढलेला गाळ शिवारात टाकल्यास जमिनीचा पोत सुधारून शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढणार आहे. गावाचे उज्ज्वल भविष्य जल आत्मनिर्भरतेवर अवलंबून असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी केले.

- Advertisement -

गावातील जलस्त्रोताचे गाळ काढून त्याचे पुनर्जीवन करून गाव पाणीदार बनवण्याच्या उद्देशाने केंद्र सरकार, राज्य सरकार व भारतीय जैन संघटनेच्या सहकार्याने सुरु करण्यात आलेल्या गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेच्या जनजागृती चित्ररथाचे उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी सालीमठ बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयात जनजागृती चित्ररथाला हिरवा झेंडा दाखवून त्याला मार्गस्थ करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील, जिल्हा जलसंधारण अधिकारी पांडुरंग गायसमुद्रे, उपविभागीय जलसंधारण अधिकारी प्रल्हाद शिंदे, भारतीय जैन संघटनेचे राज्य कार्यकारणी सदस्य आदेश चंगेडिया, महिला जिल्हाध्यक्षा प्रितम राका, पोखरणा ज्वेलर्सचे संचालक अनिल पोखरणा, उद्योजक महेश गुगळे, महेश गुंदेचा, अनुराग धुत, प्रतिक सालीमठ, संभव चंगेडिया, नयन पोखरणा, प्रतिक जगदाळे, रज्जाक तांबोली, बीजीएसचे प्रकल्प समन्वयक आसिफ शेख आदी उपस्थित होते.

प्रास्ताविकात आदेश चंगेडिया म्हणाले, जलसंधारणाच्या कामासाठी भारतीय जैन संघटनेचा नेहमीच पुढाकार राहिला आहे. भारतीय जैन संघटनेने वेळोवेळी समाज उपयोगी कार्य करून सामाजिक जबाबदारीची भूमिका बजावली आहे. सामाजिक संस्था म्हणून आपली एक ओळख निर्माण केली आहे. कोविडच्या भीषण संकटात मोफत अ‍ॅन्टीजेन टेस्ट, मोफत ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर पुरवणे व प्लास्टिक सर्जरी शिबिर माध्यमातून गरजूंना सेवा दिली. आत्महत्याग्रस्त व कोरोनाने मृत पावलेल्यांच्या मुलांची वाघोली (जि. पुणे) येथील निवासी वसतीगृहात मोफत शिक्षणाची सोय संघटनेच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे.

तीन ते चार वर्षापूर्वी भारतीय जैन संघटनेने स्वखर्चाने जेसीबी व इतर मशीनरी उपलब्ध करून विविध गावांमधील तलाव व इतर जलस्त्रोत मधील गाळ काढून शेतकर्‍यांच्या शिवारात उपलब्ध करुन देण्यात आले होते. यामध्ये सर्वात मोठी मोहिम अहमदनगर जिल्ह्यात राबविण्यात आली होती. नव्याने सुरु झालेल्या या अभियानातही भारतीय जैन संघटना वाडी-वस्तीवर जाऊन प्रचार-प्रसाराचे काम करुन लोकसहभाग वाढविण्यासह ग्रामपंचायतीमार्फत मागणी अर्ज भरून घेणार आहेत. जनजागृतीरथावर बारकोड देण्यात आला असून, ग्रामस्थांनी तो स्कॅन केल्यास त्याची सहजरित्या मागणी नोंदविण्यात येणार आहे. तर आलेल्या मागणीद्वारे प्रस्तावित कामे केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या