छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेता आणि बिग बॉस १३ चा विजेता सिद्धार्थ शुक्लाचे हार्ट अॅटॅकने निधन झाले आहे. वयाच्या ४०व्या वर्षी सिद्धार्थने अखेरचा श्वास घेतला आहे. त्याच्या निधनानंतर सर्वांनच धक्का बसला असून चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेकजण सोशल मीडिया पोस्टद्वारे सिद्धार्थला श्रद्धांजली वाहत आहे.
मात्र सहसा हृदयाशी संबंधित आजार एका वयानंतर लोकांमध्ये दिसतात, परंतु गेल्या एका वर्षात हार्ट अॅटॅकमुळे तरुणांचा मृत्यू झपाट्याने वाढला आहे. कमी वयात हार्ट अॅटॅकमुळे मृत्यू येणं ही गंभीर आणि विचार करण्यासारखी बाब असून, असं का होत आहे? या प्रश्नाचं उत्तर आपण आज जाणून घेणार आहोत.
इतर देशांप्रमाणेच भारतातसुद्धा हार्ट अॅटॅक आल्याने मृत पावणाऱ्यांचं प्रमाण झपाट्याने वाढत आहे. हार्ट अॅटॅक येण्यामागची कारणं अनेक असली तरी, बदललेली जीवनशैली हे या समस्येमागचं सगळ्यात मोठं कारण असल्याचं ह्रदयविकारतज्ज्ञ सांगतात.
हार्ट अॅटॅकमुळे मृत पावणाऱ्यांचं प्रमाण जगभरात जसं वाढत आहे, त्याच तुलनेत भारतातदेखील ही समस्या जास्त गंभीर बनत चालली आहे. अलिकडे ३० ते ३५ वयोगटातील तरुण-तरुणींना हार्ट अॅटॅकचं प्रमाण वाढलं आहे. भारतात हार्ट अॅटॅक येणाऱ्यांचं वय १० वर्षांनी कमी झालंय.
कारण अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी, आशियाई देशांमधील लोकांना हार्ट अॅटॅकचं प्रमाण जास्त आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे तरुणांमध्ये हार्ट अॅटॅकचे प्रमाण वाढत असल्याचं एका संशोधनातून स्पष्ट झालं आहे.
धुम्रपान करणं, उच्च रक्तदाब आणि मधुमेह, फळे आणि हिरव्या पालेभाज्या कमी खाणे, नियमित व्यायामाचा अभाव, पोटावर अतिरिक्त चरबी तयार होणे ही हार्ट अॅटॅकची काही महत्त्वाची कारणं आहेत.
यापासून बचाव करायचा असेल तर रोज अर्धा तास तरी निय़मित व्यायाम करायला हवा. बाहेरचे तळलेले पदार्थ खाणे टाळावे, धुम्रपान आणि मद्यप्राशन टाळावं, वयाच्या तिशीनंतर आरोग्य तपासणी करावी. जंक फूड टाळावे. ही पथ्ये पाळली तर हार्ट अॅटॅक येऊ शकत नाही असं तज्ज्ञ सांगतात.